शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध केलेल्या वक्तव्यांमुळे नाराज झालेले भाजप कार्यकर्ते शिवसेनेशी विधानसभा निवडणुकांच्या जागावाटपाची बोलणी करण्यास तयार नसल्याची माहिती प्रवक्ते माधव भंडारी यांनी दिली. उद्धव ठाकरे यांनी शनिवारी एका खाजगी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मोदी लाटेमुळे यश मिळाल्याचे नाकारले होते. मुंबईला लाटांची भीती नाही. आम्ही अनेक उंच लाटा पाहिल्या. समुद्र आमच्याजवळ आहे, असे वक्तव्यदेखील उद्धव यांनी केले होते. त्यामुळे नाराज झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेबरोबर सुरू असलेली जागावाटपाची बोलणी थांबविण्याची मागणी केली आहे.
नरेंद्र मोदी नेतृत्वाला कमी लेखण्याचा प्रकार पुन्हा पुन्हा शिवसेना नेत्यांकडून होत आहे.  नरेंद्र मोदींची लोकसभा निवडणुकीत लाट नसल्याचे बोलले जात आहे, याची मोठी आणि विलक्षण नाराजी आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे जागावाटपाची वाटाघाटी थांबविण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून होत आहे.