मुंबईत महापौरपदावरून निर्माण झालेली कोंडी फोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र शिवसैनिकांचा भाजपची युतीला विरोध आहे. तर काँग्रेसशी समझोता शक्य नाही असे मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी स्पष्ट केले.

विजयाचा जल्लोष करण्यासाठी वांद्रे येथील ‘मातोश्री’ निवासस्थानी गेलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी, तसेच शिवसैनिकांनी यापुढे भाजपशी युती करू नये अशी विनंती थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केल्याचे समजते. उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप नेत्यांकडून करण्यात आलेल्या आरोपांबाबतही शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली. प्रचारसभांमध्ये शिवसेनेवर पारदर्शकतेच्या मुद्दय़ाआडून आरोपांचे सत्र सुरू होते. त्यामुळे आता भाजपला मैत्रिचा हात पुढे करू नये, असेही शिवसैनिकांचे म्हणणे आहे. तर मुंबई महापालिकेमधील कारभार पारदर्शकपणे झालाच पाहिजे. आजही भाजप ‘पारदर्शक’तेच्या मुद्दय़ावर ठाम आहे. त्यामुळे काँग्रेससारख्या पक्षाशी युतीबाबत बोलणी अथवा समझोता करणार नाही, असे आशीष शेलार यांनी पक्षाच्या खासदार आणि आमदारांच्या बैठकीनंतर बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री आज रायगडावर

दरम्यान महापालिका निवडणुकीतील यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचे आशिर्वाद घेण्यासाठी रायगडला येथे भाजपच्या मंत्र्यांसह जाणार आहेत.