उच्च न्यायालयाकडून हस्तक्षेप करण्यास नकार ‘आम्हालाही झाडांविषयी काळजी आहे. परंतु, विकासासाठी काही तरी मध्यम मार्ग काढावाच लागतो,’ असे स्पष्ट करीत मुंबई उच्च न्यायालयाने मेट्रो-३साठी सुरू असलेली वृक्षतोड थांबवण्याचे आदेश देण्यास नकार दिला. न्यायालयाच्या आधीच्या आदेशांची ‘एमएमआरसीएल’ आणि पालिकेकडून योग्य अंमलबजावणी करण्यात येत असेल तर, स्थगिती देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. कुलाबा ते सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पाच्या मार्गातील झाडांच्या कत्तलीला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ लिमिटेडतर्फे (एमएमआरसीएल) मनमानी आणि बेकायदा पद्धतीने दक्षिण मुंबईतील झाडांची कत्तल केली जात आहे, असा आरोप करणारी याचिका चर्चगेट, नरिमन पॉइंट, कफ परेड या परिसरातील नागरिकांनी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात केली होती. न्यायमूर्ती प्रकाश नाईक आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी प्रकल्पाच्या मार्गात येणारी परंतु परवानगी दिलेली झाडेच कापण्यात येत असल्याची आणि ती कापताना कुठल्याही प्रकारे कायदा धाब्यावर बसवण्यात आलेला नाही, असा दावा मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळ लिमिटेडच्या (एमएमआरसीएल) वतीने अॅड्. मुस्तफा डॉक्टर यांनी केला. प्रकल्पासाठी १०० वर्षांपूर्वीची झाडे तोडली जात असल्याचे आपल्यालाही दु:ख असल्याचा दावाही ‘एमएमआरसीएल’कडून करण्यात आला. तर झाडे कापताना कायद्याचे पालन केले जात आहे की नाही याची पालिका आणि महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जात असल्याचा दावा पालिकेच्या वतीने अॅड्. अनिल साखरे यांनी केला. तसेच झाड कापताना त्या प्रभागातील कनिष्ठ वृक्ष अधिकारी तेथे उपस्थित राहील, अशी हमीही दिली. त्यानंतर न्यायालयाच्या मागील आदेशीची ‘एमएमआरसीएल’ आणि पालिकेकडून योग्य ती अंमलबजावणी करण्यात येत असेल तर झाडांच्या कत्तलीला स्थगिती देण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच आम्हालाही झाडांविषयी काळजी आहे. परंतु ज्या वेळी विकासाचा प्रश्न येतो तेव्हा काही मध्यम मार्ग काढावा लागतो, असे नमूद करीत झाडांच्या कत्तलीला स्थगिती देण्यास नकार दिला. वरळी, महालक्ष्मीला सर्वाधिक झळ ; पाच स्थानकांसाठी ७३४ झाडांवर संक्रांत मुंबई : कुलाबा ते सिप्झ या मेट्रो-३ प्रकल्पाच्या स्थानकांच्या बांधकामात अडसर ठरणारी सर्वाधिक झाडे चर्चगेट, कुलाबा, फोर्ट परिसरात असली तरी या तुलनेत महालक्ष्मी, वरळी, मुंबई सेंट्रल या भागांना वृक्षतोडीचा सर्वाधिक फटका बसणार आहे. येथील पाच स्थानकांच्या बांधकामात ७३४ वृक्ष अडसर ठरत आहेत. यातली अवघी ९० झाडेच टिकणार आहेत. उर्वरित ३६९ अन्यत्र पुनरेपित करण्यात येणार आहेत तर उर्वरित २७५ झाडांवर विकासाची कुऱ्हाड कोसळणार आहे. हीच परिस्थिती विमानतळ परिसरातील मेट्रो-३च्या तीन स्थानक परिसरात असणार आहेत. येथेही केवळ १० टक्केच झाडे टिकणार आहेत. त्यामुळे इथला आधीचाच उजाड परिसर आणखी रखरखीत व ओकाबोका होण्याची शक्यता आहे.कुलाबा-सिप्झ मेट्रो-३ प्रकल्पासाठी गेल्या काही दिवसांत मुंबईच्या विविध भागांत वृक्षतोडीचा सपाटा लागला आहे. मेट्रो-३ प्रकल्पात एकूण २६ स्थानके आहेत. ही मेट्रो भूमिगत असली तरी स्थानकांकरिता अनेक ठिकाणी झाडांचा बळी द्यावा लागणार आहे. या २६ स्थानकांकरिता नेमकी किती झाडे, कुठल्या भागात तोडण्यात येणार आहेत, याचा तपशील माहितीच्या अधिकारात मागविण्यात आला होता. त्यानुसार ३८९१ झाडांपकी केवळ १०९०, म्हणजे २८ टक्के झाडेच शिल्लक राहणार असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वॉचडॉग फाऊंडेशनने ही माहिती मागविली आहे. कुठे, किती झाडे तोडणार? * कफ परेड, विधान भवन, चर्चगेट आणि हुतात्मा चौक या मेट्रो-३च्या स्थानकांआड येणाऱ्या एकूण ८९० झाडांपैकी ६७२ वृक्ष एक तर तोडावे लागणार आहेत किंवा त्यांचे पुनरेपण करावे लागणार आहे. * अंतर्गत विमानतळ, सहार रोड आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ या तीन स्थानकांकरिता इथल्या एकूण ३८७ झाडांपैकी १० टक्के म्हणजे म्हणजे ३७ झाडेच शिल्लक राहणार आहेत. * मुंबई सेंट्रल ते वरळीदरम्यान असलेल्या पाच स्थानक परिसरातील ८८ टक्के झाडांवर कुऱ्हाड कोसळणार आहे. * मरोळ नाका, एमआयडीसी, सिप्झ आणि सिद्धिविनायक, दादर, शितलादेवी या स्थानक परिसरातील अनुक्रमे ५३ आणि २२ टक्के झाडे कापण्यात येणार. *आतापर्यंत १३६ झाडे (१३ टक्के) कापण्यात आली आहेत.