रेल्वे सुरक्षा दल आणि प्रवासी संघटना यांचा एकत्रित उपक्रम

‘भावेश नकाते’ प्रकरणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे कठीण असल्याने किमान प्रवासी सुरक्षेसाठी आता रेल्वे सुरक्षा दल प्लॅटफॉर्मवर उतरणार आहे. विविध प्रवासी संघटनांच्या मदतीने रेल्वे सुरक्षा दल महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवासी जागरूकता मोहीम राबवणार असून यात खचाखच भरलेल्या गाडीत जीव धोक्यात टाकून चढण्यापेक्षा पुढील गाडी पकडा, दरवाजात लटकू नका, असे संदेश देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे अशा धोकादायक पद्धतीने गाडीत चढणाऱ्या प्रवाशांना अटकाव करण्याचे कामही रेल्वे सुरक्षा दल करणार आहे. यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने १०० जवानांचे पथक तयार ठेवले आहे. ही मोहीम बुधवार, २ डिसेंबरपासूनच सुरू होणार आहे.
या मोहिमेसाठी आम्हाला प्रवासी संघटनांचाही मोलाचा पाठिंबा आणि सहकार्य मिळाले आहे. प्रवाशांच्या समस्या प्रवाशांनाच उत्तम प्रकारे माहिती असतात. तसेच जागरूकतेसाठी सहप्रवासीच जास्त उत्तम काम करू शकतात, असे मध्य रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्त ए.के. सिंह यांनी स्पष्ट केले.

गर्दीच्या वेळी डोंबिवली, कल्याण आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी कुर्ला, दादर या स्थानकांवरून गाडी पकडणे प्रवाशांसाठी अत्यंत कठीण असते. प्रचंड भरलेल्या गाडय़ांमध्ये किमान एक पाय टेकवण्यापुरती जागा मिळावी, यासाठी प्रवासी जीवाचा आटापिटा करतात.

दरवाजांवर उभ्या असलेल्या टोळक्यांची अरेरावी दिसल्यास त्याचाही बीमोड केला जाईल, असे मध्य रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्त ए. के. सिंह यांनी स्पष्ट केले. तसेच या मोहिमेसाठी खास फलक तयार करण्यात आले असून त्यांद्वारेही जागरूकता केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या मोहिमेअंतर्गत सकाळी कल्याण आणि डोंबिवली या स्थानकांवर, तर संध्याकाळी कुर्ला आणि दादर या स्थानकांवर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तैनात असतील. प्रचंड गर्दीच्या गाडीत लोंबकळत चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांची विनवणी करून त्यांना नंतर येणारी गाडी पकडण्यासाठी प्रवृत्त करण्याचे काम हे जवान करतील.