ठाकुर्लीजवळ पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वे मार्गावर झालेल्या आंदोलनात रेल्वेच्या एकूण दहा गाड्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. याचा परिणाम सहाजिकच रेल्वे सेवेवर होणार आहे. मध्य रेल्वेकडे एकूण ७५ गाड्या आहेत, त्यापैकी १० गाड्यांचं आंदोलनात नुकसान झाल्यामुळे संध्याकाळी ऐन गर्दीच्यावेळी दोन तासांमधील ३० ते ४० फे-या रद्द होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेतर्फे देण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेतर्फे बेस्ट, पीमटी, एनएमएनटी. केडीएमटी यांना जास्त बसेस सोडण्याची विनंती करण्यात आली आहे.

फोटो गॅलरी : मध्य रेल्वे कोलमडल्याने प्रवाशांचे हाल 

दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी कडक पोलिस बंदोबस्तात सीएसटीच्या दिशेने जाणारी गाडी दिवा स्थानकातून सोडल्यानंतर मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दिवा स्थानकातून विशेष गाडी सीेएसटीसाठी सोडण्यात यावी, ही मागणी मान्य झाल्यानंतर ट्रॅकवरील जमावाला बाजू करण्यात पोलिसांना यश आलं आणि आता वाहतूक उशीराने पण सुरळीत सुरू आहे. 

फोटो गॅलरी : नवीन वर्षातही ‘म.रे.’च!      

शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ठाकुर्लीजवळ पेंटाग्राफ तुटल्याने जवळपास सहा तास मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत होती. दरम्यान, रेल्वेने दोन तासांच्या विक्रमी वेळेत बिघाड दुरूस्त केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मात्र, गाड्या वेळेवर धावत नसल्याने आणि प्रवाशांना याबाबत रेल्वेकडून काहीच माहिती मिळत नसल्याने संतप्त प्रवाशांनी दिवा स्थानकात रेल रोको केला. पण संतप्त जमावातर्फे पोलीस व्हॅन पेटवण्यात आली आणि पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. तसेच तीन खासगी गाड्या जाळण्याचाही प्रयत्न केल्याचे कळते. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनाही प्रवाशांवर लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर रेल्वे आणि स्थानिक प्रशासनाच्या वरिष्ठ अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली व विविध उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या व प्रवाशांना शांतता राखण्याचे आवाहनही केले.  

दिवा स्थानकातील एटीव्हीएम मशिन्स, तिकीट खिडक्या व अन्य सामानांचीही मोठ्या प्रमाणावर नासधुस करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिवा स्थानकात जाऊन प्रवाशांना रेल्वेला सहकार्य करण्याते आवाहन केले.  


सीएसटीकडे जाणा-या आणि कल्याणकडे जाणा-या धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आल्याने दोन्ही मार्गांवर  गाड्यांची एकामागोमाग रांग लागली आहे. तसेच सर्व प्लँटफॉर्मवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. 

सुरक्षेचे आश्वासन मिळाल्यानंतर मोटरमन्सच्या काम बंद आंदोलनाला स्थगिती

प्लँटफॉर्मवर मोबाईल फोनचे नेटवर्क जँम झाल्याने प्रवासी आता प्लँटफॉर्मच्या बाहेर गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरातही लोकांची गर्दी झाली आहे. यावेळी गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. तसेच काही प्रवाशांनी गाड्यांवर दगडफेक केली. त्याचा परिणाम या परि
सरातील वाहतुकीवरही झाला आहे.

मुख्यमंत्री म्हणतात…


सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून योग्य ती उपाययोजन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी शांतता राखवी आणि प्रशासनाला सहकार्य करावं.  – गृहराज्यमंत्री रणजित पाटील

प्रवाशांना मोबाईल तिकिट, स्वयंचलित जिने यांसारख्या सुविधा देताना मुख्य प्रवासाच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. त्यामुळे ‘अच्छे दिन आएंगे’ अशी स्वप्ने दाखवणा-यांवर आता टिकेचा भडिमार होताना पहायला मिळत आहे. मुंबईतील वाहतुकीच्या प्रश्नामुळे मंत्रालयातील कर्मचा-यांना उशीरा येण्याची आणि उशीरापर्यंत थांबण्याची मुभा देण्यात आली आहे. परंतु, वाहतुक व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने प्रशासनातर्फे कोणतीच पावले का उचलली जात नाहीत, असा सवाल आता कर्मचारी आणि प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.