तुंबलेले पाणी बाहेर काढण्यासाठी २३ पंप; नालेसफाई आणि रुळांवरील कचरा दूर यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला असला, तरी या पावसाला तोंड देण्यासाठी मध्य रेल्वेने पुरेपूर तयारी केली आहे. मध्य रेल्वेने दरवर्षीप्रमाणे ३१ मेच्या आधीच ही कामे पूर्ण केली आहेत. रेल्वेने दरवर्षी पाणी तुंबणाऱ्या सखल भागांची नोंद घेतली असून तेथील पाणी काढण्यासाठी २३ पंप बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे नाले, रूळ आणि रुळांलगतची गटारे आदी ठिकाणचा कचरा साफ केला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मध्य रेल्वेवर मशीद, माझगाव यार्ड, भायखळा, करीरोड, शीव, कुर्ला, विक्रोळी, घाटकोपर, नानीपाडा, ठाणे, मुंब्रा, डोंबिवली, शिवडी, वडाळा, चुनाभट्टी, टिळकनगर आणि चेंबूर या ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. रेल्वेने यंदा या २० ठिकाणी एकूण २३ पंप बसवण्याचा निर्णय घेतला आहे. हे पंप १२.५ अश्वशक्तीचे असतील. त्याशिवाय मुंबई महापालिकेतर्फेही १५ पंप बसवण्यात येणार आहेत. हे पंप माझगाव यार्ड, मशीद बंदर, बर्कले हाऊस भायखळा, साईबाबा मंदिराजवळील रेल्वेचा पादचारी पूल, चिंचपोकळी स्थानक, परळ स्थानक, शीव स्थानकाजवळ दोन पंप, विद्याविहार स्थानकाजवळील गौरीशंकर वाडी, घाटकोपर-विक्रोळीदरम्यान, भांडुप स्थानकात, नाहूर आणि शिवडी येथे बसवण्यात येतील.तुंबलेले पाणी उपसण्यासाठी हे पंप बसवताना रेल्वेने पाणी तुंबू नये, याचीही काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या मार्गावरील १.१० लाख मीटरची गटारे मध्य रेल्वेने साफ केली आहेत. त्याचप्रमाणे उपनगरीय क्षेत्रातील ५८ नाल्यांची सफाई एकदा करून झाली आहे. तर या नाल्यांची पुन्हा सफाई ३१ मेपर्यंत पूर्ण होणार आहे. नाल्यांमधून आणि रुळांदरम्यान रेल्वेने १७५०० घनमीटर कचरा वेचून बाजूला केला आहे. या पावसाळी कामांमुळे यंदा मध्य रेल्वेवर कमीत कमी पाणी तुंबेल. त्याचप्रमाणे सिग्नल यंत्रणेमध्ये ऑक्झिलरी वॉर्निग सिस्टिम बसवल्याने पावसाळ्यात पाणी तुंबले, तरीही मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा बंद पडणार नाही, असा विश्वास मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला.