मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे गुजरातच्या वाटेवर असताना आता मुंबईच्या जीवनवाहिनीच्या म्हणजेच मध्य रेल्वेच्या नाडय़ाही गुजरातच्याच हाती सोपवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मध्य रेल्वेला लागणारी वीज आता गुजरातमधून घेण्याचा विचार मध्य रेल्वे प्रशासन करत आहे. महावितरण आणि टाटा यांच्या विजेच्या तुलनेत गुजरातमधील वीज दोन ते तीन रुपये प्रतियुनिट स्वस्त आहे.
मध्य रेल्वेला दरमहा १६० दशलक्ष युनिट वीज लागते. त्यासाठी सध्या मध्य रेल्वेचे १४४ कोटी रुपये दरमहा खर्च होतात. रेल्वे ही वीज प्रामुख्याने महावितरण आणि टाटा यांच्याकडून घेते. महावितरणचा विजेचा दर सुमारे सात रुपये प्रतियुनिट  होता. तर टाटाची वीज सुमारे साडेपाच रुपये प्रतियुनिट या दराने मिळत होती. मात्र, या दरांत वाढ करत महावितरणने प्रतियुनिट ९.२ रुपये आणि टाटाने ७.८ रुपये प्रतियुनिट दरआकारणी सुरू केली. त्यामुळे मध्य रेल्वेच्या विजेच्या खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. गुजरामध्ये हाच दर पाच ते सहा रुपये यादरम्यान आहे. त्यामुळे मध्य रेल्वे गुजरातकडून वीज विकत घेण्याचा विचार करत असल्याचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले. रेल्वे दरवाढीस होणारा विरोध, रेल्वेवर वीज दरवाढीमुळे पडणारा अतिरिक्त बोजा आणि भारतीय रेल्वेखात्यासमोरील आव्हाने लक्षात घेता, अन्य पर्यायांचा विचार करणे अनिवार्य होते.

खूपच कमी राज्ये रेल्वेवर कर लावतात. महाराष्ट्रात हा कर लागू होतो. मात्र रेल्वेकडून प्रवाशांना अत्यल्प दरात सेवा द्यावी, अशी येथील राज्यकर्त्यांची अपेक्षा आहे. आम्हाला पुरवण्यात येणारी वीजही औद्योगिक दराने विकली जाते. शिवाय सवलतही मिळत नाही. गुजरातकडून आम्हाला दोन ते तीन रुपये प्रतियुनिट कमी दराने वीज मिळाल्यास मध्य रेल्वे मासिक १० ते १५ कोटी रुपये वाचवू शकेल.
– ब्रिगेडियर सुनीलकुमार सूद, महाव्यवस्थापक