पंढरपूरमधील चंद्रभागेचे पात्र आणि लगतचा परिसर प्रदूषणमुक्त राहावा यासाठी तेथे कुठल्याही प्रकारचे बांधकाम करण्यास उच्च न्यायालयाने मज्जाव केलेला आहे. मात्र भाविकांची गरज लक्षात घेता तेथे शौचालये बांधण्याची सूचना खुद्द न्यायालयाने या सगळ्या समस्येसाठी स्थापन केलेल्या समितीने केली आहे.
पंढरपूर यात्रेदरम्यान शौचालयांअभावी परिसरात तसेच वारीच्या वाटेवर होणाऱ्या प्रदूषणाची आणि हाताने मैला साफ करण्याची प्रथा  कायम असल्याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली होती. तसेच चंद्रभागेच्या पात्रात आणि परिसरात बांधकाम करण्यास मज्जाव केला होता. ‘नीरी’च्या शिफारशी व वकिलांनी पाहणी करुन सादर केलेल्या अहवालाच्या पाश्र्वभूमीवर न्यायालयाने हे आदेश दिले होते.
शुक्रवारी समितीने आपला अहवाल सादर केला. त्यात शौचालये कशी, कुठे व किती प्रमाणात बांधण्यात येणार याची आकडेवारी देण्यात आली आहे. परंतु नदीपात्रात शौचालये बांधणे आवश्यक असल्याचे समितीने अहवालात म्हटले आहे.