गणेशोत्सवात नियम धाब्यावर बसवून कर्णकर्कश्श आवाजात ध्वनिक्षेपकाचा वापर करणाऱ्या, तसेच रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांमध्ये रंगणाऱ्या गणेशोत्सव मंडळांसाठी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने आचारसंहिता तयार केली आहे. या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन समन्वय समितीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने ध्वनिप्रदूषणात भर पडत असल्याची ओरड होऊ लागली आहे. ही बाब लक्षात घेऊन समन्वय समितीने गणेशोत्सव मंडळांसाठी आचारसंहिता जारी केली आहे. ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत करू नये, सरकारने गणेशोत्सवात चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास दिलेल्या परवानगीचे भान राखावे, ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची मर्यादा ४५ डेसिबल असावी, रुग्णालय, शाळा, न्यायालय, धार्मिक स्थळे आदींपासून १०० मीटर परिसरात ध्वनिक्षेपकाचा मर्यादित वापर करावा, ध्वनिक्षेपक यंत्रणा बसविणाऱ्या कंत्राटदाराशी नियमांचे उल्लंघन होणार नाही याबाबत करार करावा, गणेशोत्सवात भक्तिगीते, सुगम संगीत, भावगीते, भजने लावावीत, मिरवणुकांमध्ये डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या सूचनांचे पालन करावे, अशा सूचना समन्वय समितीकडूून करण्यात आल्या आहेत.मंडपस्थळी ध्वनिक्षेपकाच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मोबाइलमध्ये ध्वनिमोजक अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे आणि मंडप परिसरात ध्वनिप्रदूषण होऊ नये याची काळजी घ्यावी, असेही समन्वय समितीने आपल्या आचारसंहितेत नमूद केले आहे.