सिंचनक्षेत्रातील गैरव्यवहारांबाबत झालेल्या आरोपांनंतर ‘स्वेच्छेने’ पायउतार झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळात पुनरागन करत आहेत. सिंचन घोटाळय़ाच्या श्वेतपत्रिकेत भ्रष्टाचाराबाबत अवाक्षरही न आढळल्याने ‘उजळलेले’ अजित पवार शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. श्वेतपत्रिकेने अजितदादांना ‘क्लीनचिट’ दिल्याचा दावा करत राष्ट्रवादीने ताबडतोब अजितदादांच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा केल्याने ‘नेमकी घाई कुणाला’ असा सवाल आता विचारला जात आहे.
सिंचन घोटाळ्यांवरून झालेल्या आरोपांमुळे संतप्त झालेल्या अजित पवार यांनी २५ सप्टेंबरला उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. सिंचन घोटाळ्याची चौकशी तसेच खर्चाची कारणमीमांसा करण्यासाठी राजीनामा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.