जे. कुमार कंपनीला मेट्रोचे कंत्राट दिल्यावरुन काँग्रेसने भाजप सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्ट कंपनीवर मेहेरबान असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या जे. कुमार कंपनीला मेट्रोचे कंत्राट का देण्यात आले, असा प्रश्न काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. जे. कुमार कंपनीला याआधी मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्यांची कंत्राटे मिळाली आहेत. मात्र या बांधकामांमध्ये घोटाळा झाल्याने कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले. या कंपनीची नोंदणीदेखील रद्द करण्यात आली आहे. अशा कंपनीला मेट्रो ३ आणि मेट्रो ७ चे कंत्राट कसे काय दिले जाते, असा प्रश्न काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी विचारला आहे. मेट्रोच्या बांधकामासाठी जे. कुमार कंपनीला ५ हजार कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र जे. कुमार कंपनी अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे या कंपनीविरोधात एफआयआर दाखल आहे. शिवाय या कंपनीचे नाव काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. त्यामुळे अशा कंपनीला तब्बल ५ हजार कोटींचे कंत्राट कसे काय मिळते, असा प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आहे. याप्रकरणी महाधिवक्त्यांचे मत विचारात घेतले जाईल, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळात दिली होती. मग महाधिवक्त्यांचे मत डावलून मुख्यमंत्री भ्रष्ट ठेकेदारांवर इतके मेहेरबान का झाले, असा प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आहे.