पेट्रोल दरवाढीविरोधात तीन दिवसांनी आवाज पेट्रोलवरील अधिभारात तीन रुपये वाढ करण्याचा निर्णय राज्यातील भाजप सरकारने शुक्रवारी रात्री घेतला, पण या दरवाढीच्या विरोधात आवाज उठविण्यास काँग्रेस नेत्यांना तब्बल तीन दिवसांनी जाग आली. दारूची दुकाने बंद पडल्याने बुडणारा महसूल भरून काढण्याकरिता सामान्यांवर भरुदड कशाला, असा सवाल काँग्रेसने केला आहे. भाजपविरोधात असताना दरवाढ किंवा काहीही निर्णय झाल्यास त्यावर त्वरित प्रतिक्रिया व्यक्त केली जात असे. सत्ता जाऊन जवळपास तीन वर्षे झाली तरी काँग्रेस नेत्यांमध्ये हे कसब अद्याप आलेले नाही. पेट्रोलच्या दरात लिटरला तीन रुपयांनी वाढ करण्याचा आदेश वित्त विभागाने शुक्रवारी रात्री उशिरा जारी केला. या दरवाढीवरून सामान्यांमध्ये प्रतिक्रिया उमटली असली तरी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी या मुख्य विरोधी पक्षांनी आवाज उठविला नव्हता. सोमवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दरवाढीच्या विरोधात सरकारचा निषेध करीत ही दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. राज्यात दुष्काळी परिस्थिती नाही हे राज्य सरकारने मान्य केले आहे. केंद्राकडे मदतीची मागणीही केलेली नाही. तरीही दुष्काळाच्या नावाखाली हा अधिभार कशासाठी वसूल केला जात आहे, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राष्ट्रीय महामार्गालगतची ५०० मीटर परिसरातील दारूची दुकाने बंद करावी लागली. त्यातून बुडणारा महसूल भरून काढण्याकरिता पेट्रोलच्या दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. दारूची दुकाने बंद झाल्याची शिक्षा सामान्य नागरिकांना देण्याचा प्रयत्न चुकीचा असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली आहे.