एरव्ही कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काँग्रेसमध्ये घोळ घातला जातो; पण माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पक्षाला आव्हान दिल्यावर लगेचच सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस समिती बरखास्त करून त्यांना झटका देण्यात आला. काँग्रेसकडून करण्यात आलेल्या या अनपेक्षित कारवाईमुळेच राणे यांना तातडीने शक्तिप्रदर्शन करावे लागले. काँग्रेस पक्षाला आव्हान दिले तरी लगेचच दखल घेतली जात नाही, असा अनुभव आहे. सोनिया गांधी यांच्या सभेत झालेला गोंधळ किंवा राहुल गांधी व अहमद पटेल यांच्यावर टीकाटिप्पणी केल्यावरही पक्षाने राणे यांच्याविरुद्ध लगेचच कारवाई केली नव्हती. राणे भाजपच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाल्यावर काँग्रेसने त्यांना दुर्लक्षित केले होते. राणे यांनी पक्ष सोडल्यास संघटनेवर परिणाम होऊ नये म्हणून खासदार हुसेन दलवाई, आमदार हुस्तेबानू खलिफे, राजन भोसले यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्य़ांचा दौरा केला असता राणे यांनी त्यांना आव्हान दिले. राणे यांनी पक्षाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असता राज्यातील नेत्यांनी ही बाब दिल्लीच्या निदर्शनास आणून दिली. काँग्रेसमध्ये एरव्ही कोणाविरुद्ध कारवाई किंवा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी चर्चेचा घोळ घातला जातो. अनेक दिवस चर्चाच सुरू असते; पण राणे यांच्या विरोधात कारवाईचा निर्णय तातडीने घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस समिती बरखास्त करून विकास सावंत यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, खासदार हुसेन दलवाई आदींनी दिल्लीदरबारी कारवाईकरिता आग्रह धरला होता. यामुळेच राणे व त्यांच्या दोन्ही पुत्रांनी अशोक चव्हाण यांना लक्ष्य केले होते. काँग्रेसने जिल्हा काँग्रेस समिती बरखास्त केल्याने राणे यांचाही नाइलाज झाला. पक्षाने झटका दिल्यावर गप्प बसले असते तर राणे यांच्यावर टीका झाली असती. काँग्रेस पक्ष टोकाची भूमिका घेईल, असा अंदाज राणे यांनाही आला नव्हता. राणे यांनी कुडाळमध्ये शक्तिप्रदर्शन केले. नितेशची अटक टाळण्यासाठी प्रयत्न केले - विखे-पाटील सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील आंदोलनानंतर नितेश राणे यांची अटक टाळण्यासाठी मी काय काय केले याची वाच्यता करण्यास मला भाग पाडू नये. अन्यथा त्यांची अडचण होईल, असे प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नितेश यांना दिले आहे. नितेश हे राजकीयदृष्टय़ा अजून अपरिपक्व आहेत, असा टोलाही विखे-पाटील यांनी लगावला.