जन्मदात्री आई आणि वयोवृद्ध आजीची गळा आवळून हत्या केल्यानंतर तरूणाने स्वत: गळफास घेत आपले आयुष्य संपवले. अंधेरी पश्चिमेकडील इंदिरा नगरातल्या संक्रमण शिबिरातील ही घटना घडली. शेजारील एका लहान मुलीने तरूणाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले आणि या घटनेला वाचा फुटली. आईचा हट्ट, त्यातून सतत चढणारे कर्ज या परिस्थितीला वैतागून तरूणाने हे पाऊल उचलले असावे, असा संशय पोलिसांना आहे. दादाभाई नौरोजी तथा डी. एन. नगर पोलीस या घटनेची चौकशी व तपास करत आहेत. समीर बारसकर(३३), मीनाताई तथा रोहिणी बारसकर(५५) आणि फातीमा इब्राहिम शेख(६५) अशी तिघांची नावे आहेत. समीर हे मीना यांचे दुसऱ्या पतीपासून(नवाब खान) झालेले अपत्य. तर फातीमा या मीना यांच्या जुन्या शेजारी. पण हक्काचे कोणीच नसल्याने अनेक वष्रे फातीमा याच कुटुंबासोबत वास्तव्यास होत्या. समीरला त्यांच्या अंगाखांद्यावर लहानाचा मोठा झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समीर आणि त्याची आई मीना अंधेरीतल्या जीवन नगर परिसरात वडापाव, चहाची टपरी चालवत. याच परिसरातल्या शीतला देवी झोपडपटटीत हे कुटुंब पुर्वी राहात होते. सहा महिन्यांपासून मात्र इंदिरानगरातील संक्रमण शिबिरात भाडय़ाची खोली घेऊन वास्तव्यास होते. सकाळी शेजारील एक मुलगी दूध आणण्यासाठी बाहेर पडली. बारसकर यांच्या खोलीचा दरवाजा किंचित उघडा होता. त्यातून समीर गळफास घेतलेल्या स्थीत आढळल्याने घाबरलेल्या या मुलीने आपल्या पालकांना ही बाब सांगितली. तिचे पालक घरी आले तेव्हा मीना व फातीमा याही बेशुद्धावस्थेत आढळल्या. त्यांनी तातडीने पोलिसांना वर्दी दिली. पोलिसांनी तीन्ही मृतदेह ताब्यात घेत कुपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी धाडले. समीरच्या आत्महत्येने शितला देवी झोपडपट्टीतील रहिवाशी हादरले. दहावीचे शिक्षण इंग्रजी शाळेतून घेतलेला समीर शांत, प्रेमळ स्वभावाचा होता. तो आईची हत्या करेल, स्वत: आत्महत्या करेल यावर विश्वास बसत नाही, अशी प्रतिक्रिया या परिसरातून रुग्णालयात आलेला मित्रपरिवार व्यक्त करत होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार समीर कर्जाच्य ओझ्या खाली होता. पण कर्ज कशासाठी, किती याची नेमकी माहिती पोलिसांना मिळालेली नाही. प्रभारी वरिष्ठ पोलीस निरिक्षक सावंत यांनी लोकसत्ताला दिलेल्या माहितीनुसार मीना यांचे पहिले पती रविकांत बारस्कर यांचा मृत्यू झाला. त्यांना दोन मुले होती. मात्र रवीकांत यांच्या पालकांनी त्यांना स्वत:कडे ठेवून घेतले. मीना यांचे दुसरे पती नवाब यांचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे या परिवाराला जवळचे, रक्ताचे नातेवाईक नाहीत. शितला देवी परिसरात मीना यांचे चार तर फातीमा यांची एक अशा पाच खोल्या होत्या. तेथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना सुरू आहे. प्रकल्प सुरू होण्याआधी व झाल्यानंतर मीना यांनी या पाचही खोल्या कवडीमोल भावाला विकून टाकल्या. तसेच त्या वरचेवर कर्ज घेत. त्या कर्ज का व कशासाठी घेत याची माहिती समीरला होती. आईने घेतलेले कर्ज फेडण्याचा प्रयत्न समीर करत होता. आईच्या हट्टी स्वभाव सहनशक्तीच्या पलिकडे गेल्याने समीरने हे पाऊल उचलल्याचा संशय आहे.