ठाण्यात पहिल्यांदाचा भरलेल्या उपवन आर्ट फेस्टिव्हलने रविवारी संध्याकाळपर्यंत गर्दीचा नवा उच्चांक नोंदवला. रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत उपवन फेस्टिव्हलसाठी आलेल्या कलाप्रेमींची संख्या पावणे तीन लाखांच्या घरात पोहचली होती. शुक्रवार पासून ठाणे शहरासह थेट वसई, बोरीवली, नेरळ, बदलापूर, कर्जत अगदी पनवेलपासून कलाप्रेमी या महोत्सनात सहभागी होण्यासाठी येत होते. रविवारी एकाचवेळी ठाण्याच्या रस्त्यांवर आवतरलेल्या गर्दीमुळे उपवनकडे जाणारे रस्ते तुडूंब भरले होते.शुक्रवारी सुरु झालेल्या उपवन आर्ट फेस्टिव्हलच्या निमित्ताने एकाच ठिकाणी कलेच्या विविध गुणांचे दर्शन रसिकांना झाले. ख्यातनाम आंतरराष्ट्रीय- राष्ट्रीय कलाकारांसह, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, पनवेल, भिवंडी येथील एक हजाराहून अधिक स्थानिक कलाकारांनी या महोत्सवात सहभाग घेतला. रविवारीची सकाळ ख्यातनाम गायिका पार्वथी बवूल आणि गायक प्रल्हाद तिपानिया यांच्या भक्तीसंगीताने उपवनच्या किनारी उजाडली. ज्येष्ठ नागरिकांचा मोठा प्रतिसाद असलेल्या या कार्यक्रमात रसिक तृप्त झाले. सकाळी १० वाजता तलावाच्या काठी उभ्या असलेल्या पाच रंगमंचांवर कलांच्या रादरिकरणास सुरुवात झाली. यावेळी इनरविल क्लबच्या महिलांनी स्त्री जागृतीचा जागर घातला. चर्चासत्र, नृत्य, वारली चित्रकला यांचे एकाहून एक सरस सादरीकरण यावेळी झाले. येऊरची विशाल डोंगर, तेथील हिरवाई, डेरेदार वृक्षांमध्ये रम्य अशा उपवन तलावाच्या परिसरात शिस्तबध्द मांडणी रसिकांच्या कौतुकाचा विषय बनली होती. कलेसाठी पोषक वातावरण असल्याने दुपारनंतर गर्दीचा ओघ अधिक वाढू लागला आहे असे कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुणकुमार यांनी सांगितले. जयतीर्थ मेवुंडी यांच्या शास्त्रीय गायन आणि एल. सुब्रमण्याम् यांच्या व्हायोलिन वादनाच्या संगीत मैफलीने महोत्सवाची सांगता झाली. उपवन महोत्सवास उसळलेल्या गर्दीमुळे उपवनकडे जाणारे रस्ते वाहनांनी तुडूंब भरले होते. येऊरच्या गेटजवळ वाहतूक महोत्सवासाठी आलेली वाहने रोखण्यात आली होती. तर वसंत विहारकडे जाणाऱ्या वाहनांना शिवाजीनगर येथून सोडण्यात येत होते. मोठय़ा संख्येने वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर उतरून महोत्सवात वाहतूक खोळंबा होणार नाही यासाठी प्रयत्न सुरु होता. मात्र एकाच वेळी मोठय़ासंख्येने रस्त्यावर उतरलेल्या कलाप्रेमींमुळे काही वेळ वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. याचा फटका देखील रसिकांना सहन करावा लागला.