रुग्णांच्या नातेवाईकांकडून सातत्याने सुरू असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारपासून सुरू ठेवलेले काम बंद आंदोलन निवासी डॉक्टरांनी अखेर मागे घेतले व उच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीचे पालन करत शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून डॉक्टर कामावर रुजू झाले. पाच दिवस सुरू राहिलेल्या या आंदोलनामुळे मुंबईसह राज्यभरातील सरकारी रुग्णालयाची व्यवस्था कोलमडली होती व हजारो रुग्णांना त्रास सहन करावा लागला.

महिन्याभरात डॉक्टरांना मारहाणीच्या पाच घटना घडल्या. रविवारी शीव रुग्णालयात डॉक्टरांना झालेल्या मारहाणीनंतर तेथील निवासी डॉक्टरांनी काम बंद केले. सोमवारी इतर निवासी डॉक्टरांनीही रजा आंदोलन सुरू केले. इंडियन मेडिकल असोसिएशननेही निवासी डॉक्टरांना पाठिंबा देत खासगी सेवाही बंद केल्या. आपत्कालीन सेवांव्यतिरिक्त सर्व वैद्यकीय सुविधा बंद राहिल्याने तसेच शस्त्रक्रिया अडल्याने राज्यभरातील रुग्णांचे हाल झाले.  वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरक्षा वाढवण्याचे आश्वासन देऊनही निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन मागे घेतले नव्हते. आश्वासन देऊनही सुरक्षाव्यवस्था न वाढल्याने तसेच हल्ले सुरूच राहिल्याने डॉक्टरांनी आंदोलन सुरू ठेवले.  मार्ड संस्थेने अधिकृतरीत्या संप पुकारला नव्हता. त्यामुळे उच्च न्यायालयाने गुरुवारी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेला आंदोलन मागे घेण्याचा आदेश देऊनही बहुतांश डॉक्टरांनी आंदोलन सुरू ठेवले. अखेर शुक्रवारी उच्च न्यायालयाने शनिवारी सकाळी आठनंतर कामावर उपस्थित न होणाऱ्या डॉक्टरांविरोधात कारवाई करण्यास अनुमती दिली. त्यानंतरही शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत डॉक्टरांच्या संपाबाबतच्या भूमिकेबाबत संभ्रम कायम होता. अखेर मध्यरात्रीनंतर डॉक्टरांनी भूमिका सौम्य केली. उच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीनुसार शनिवारी सकाळी निवासी डॉक्टर कामावर हजर झाले व कोलमडलेली रुग्णालयांची अवस्था सुधारली. मात्र आठवडाभर रखडलेल्या शस्त्रक्रिया तसेच रविवारी बाह्य़ रुग्ण कक्ष बंद असल्याने रुग्णालयांच्या सेवा सुरळीत होण्यासाठी सोमवार उजाडणार आहे.