डॉ. सदानंद मोरे यांची अपेक्षा; जयराज साळगावकर यांच्या ‘चैतन्य गुरू गोरक्षनाथ’ ग्रंथाचे प्रकाशन धर्म किंवा संत परंपरा यांबाबत आपल्याकडे अनेक ग्रंथ आहेत, पण हे ग्रंथ श्रद्धेच्या किंवा भक्तीच्या अंगाने लिहिले गेले आहेत. त्याऐवजी धर्माची चिकित्सा बुद्धिवादाच्या अंगाने करू पाहणारे आणि ऐतिहासिक अभ्यासाच्या दृष्टीने लिहिले गेलेले ग्रंथ निर्माण व्हायला हवेत. जयराज साळगावकर यांचा ‘चैतन्य गुरू गोरक्षनाथ’ हा ग्रंथ ही उणीव नक्कीच भरून काढणारा आहे, असे सांगत ज्येष्ठ संतवाङ्मय अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी नाथ संप्रदाय, बौद्ध व जैन धर्म, वारकरी संप्रदायातील शैव-वैष्णव परंपरांचा मिलाफ आदी गोष्टींबाबत विवेचन केले. जयराज साळगावकर लिखित ‘चैतन्य गुरू गोरक्षनाथ’ या मराठी ग्रंथाच्या आणि याच ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती ‘द गोरक्षनाथ एन्लायटन्मेण्ट’ यांच्या प्रकाशनादरम्यान ते बोलत होते. वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये झालेल्या छोटेखानी प्रकाशन समारंभात परममित्र प्रकाशनातर्फे मराठी ग्रंथाचे आणि इंडस सोर्स पब्लिकेशनतर्फे या ग्रंथाच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन शनिवारी संध्याकाळी झाले. या प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीष्मराज बाम होते, तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सदानंद मोरे यांनी विवेचन केले. त्याशिवाय नाथ संप्रदायाचे भाईनाथ महाराज आणि परममित्र प्रकाशनाचे माधव जोशी उपस्थित होते. या ग्रंथाचे महत्त्व विशद करताना भीष्मराज बाम यांनी भारतीयांच्या दस्तावेजीकरण न करण्याच्या प्रवृत्तीवर टीका केली. वेद आपण अपौरुषेय मानतो, कारण वेद लिहिणाऱ्यांचे नाव नाही. आपल्याकडील ज्ञान मौखिक असल्याने ते सूक्ष्म करून सांगण्याकडे कल होता. परिणामी, पुढील पिढय़ांनी सूक्ष्म केलेल्या त्या ज्ञानाचा अर्थ आपल्या सोयीप्रमाणे लावला. त्यामुळे संशोधन करणाऱ्यांचा मार्ग खडतर झाला आहे. या पाश्र्वभूमीवर साळगावकर यांच्या या ग्रंथाचे मोल समजेल, असेही ते म्हणाले. नाथ पंथाने सांगितलेला विवेक आणि साधनेचा मार्ग आपण विसरल्यानेच भ्रष्टाचार, अनीती आदी समस्या निर्माण झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हा ग्रंथ लिहिण्यासाठी अनेक वर्षांचा अभ्यास गरजेचा होता. १९८४पासून सुरू झालेला हा प्रवास टप्प्याटप्प्याने पूर्ण होत आला. केवळ अपघाताने लाओसला पोहोचलो आणि तेथील बौद्ध मठ पाहता आले, चर्चा करता आली. अशा अनेक ‘अपघातां’मधूनच हा ग्रंथ साकार झाल्याची भावना जयराज साळगावकर यांनी व्यक्त केली. तसेच दुर्गाबाई भागवत, बीकेएस अय्यंगार, प्रशांत अय्यंगार, म. रा. जोशी, पं. सत्यशील देशपांडे, चंद्रकांत खोत, डॉ. श्रीकांत बहुळकर अशा अनेकांचे सहकार्य गेल्या अनेक वर्षांमध्ये लाभल्याचेही त्यांनी सांगितले. नाथ संप्रदायातील विखुरलेल्या धाग्यांना एकत्र बांधण्याचे काम शंकरापासून सुरू झालेल्या नाथ संप्रदायाचा प्रभाव महाराष्ट्रातच नाही, तर भारतात सर्व प्रांतांमध्ये आढळतो; पण या संप्रदायाबाबत अनेक गैरसमजही आहेत. वारकरी संप्रदायाला वेगळी कलाटणी देणारे संत ज्ञानेश्वर आणि त्यांचे बंधू व गुरू निवृत्तीनाथ हे दोघेही नाथ संप्रदायाचेच होते. नाथ संप्रदायासारख्या व्यापक विषयातील धर्म, तत्त्वज्ञान, साधना, भक्ती, योग अशा अनेक विखुरलेल्या धाग्यांना एकत्र बांधण्याचे काम जयराज साळगावकर यांनी केले आहे, असेही डॉ. मोरे यांनी स्पष्ट केले.