रमाबाई आंबेडकर नगरमधून तीन किमीचा रस्ता दक्षिण मुंबईतून पूर्व उपनगरांना जोडणारा पूर्व मुक्त मार्ग तीन किमीने वाढवून आता पूर्व द्रुतगती मार्गाला जोडण्याचा प्रस्ताव मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) विचाराधीन आहे. मात्र हे विस्तारीकरण करण्यापूर्वी या मार्गात येणाऱ्या दोन हजार झोपडय़ांचे पुनर्वसन करण्याचे मोठे आव्हान प्राधिकरणाला पेलावे लागणार आहे. पूर्व मुक्त मार्ग संपल्यानंतर घाटकोपरजवळ होणाऱ्या वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून हा मार्ग थेट पूर्व द्रुतगती मार्गाला जोडण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. रमाबाई नगरमधून हा मार्ग जाणार असून यासाठी प्राधिकरणाला दोन हजार झोपडय़ांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. यासाठी एका बांधकाम व्यावसायिकाने आणि एमएमआरडीएने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर केला आहे. मात्र हे काम सुरू होण्यास अद्याप एक वर्षांचा कालावधी लागणार आहे. दरम्यानच्या काळात सागरी किनारा प्राधिकरणाकडून आवश्यक त्या परवानग्या घेण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास घाटकोपर-मुलुंड जोड रस्त्यावरील छेडानगर येथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून येणाऱ्या वाहनांची विशेष सोय होणार असून तेथील कोंडी कमी होणार आहे. पूर्व मुक्त मार्गाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव अद्याप प्राथमिक पातळीवर असून सुरुवातीला तेथील दोन हजार झोपडय़ांचे पुनर्वसन केले जाईल,असे एमएमआरडीएचे सहप्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी सांगितले.