खात्यांचा भार हलका होण्याची शक्यता; आणखी दोन-तीन प्रकरणे बाहेर येणार? विविध आरोपांमुळे बेजार झालेल्या महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या विरोधात जमीन घोटाळाप्रकरणी पोलिसांत दाखल झालेली तक्रार, दाऊदशी झालेल्या कथित दूरध्वनी संभाषणाची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी न्यायालयात दाखल झालेली याचिका, जळगावात सिंचन ठेकेदाराशी हातमिळवणी केल्याचा अंजली दमानिया यांनी केलेला आरोप या सगळ्यामुळे खडसे यांचा पाय अधिकच खोलात जाऊ लागला आहे. त्यातच खडसे यांच्याविरोधात आणखी दोन-तीन प्रकरणे बाहेर येण्याची चर्चा आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर खडसे यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांची बाजू मांडली. त्यावर आता मुख्यमंत्री काय भूमिका घेतात यावर खडसेंचे भवितव्य अवलंबून आहे. खडसेंवरील खात्यांचा अतिरिक्त ‘भार’ हलका केला जाण्याची शक्यता पक्षातून व्यक्त होत आहे. पुण्यातील जमीन अल्प दरात खरेदी केल्याचे प्रकरण गाजत असतानाच ही जमीन खरेदी करण्यापूर्वी खडसे यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती, हा मुद्दा समोर आला आहे. ही जमीन खासगी मालकीची असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचा या जमिनीशी काहीही संबंध नाही, असा खुलासा खडसे यांनी केला असला तरी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ही जमीन औद्योगिक मंडळाची असल्याचे सांगत खडसे यांच्या अडचणींमध्ये वाढ केली. मात्र, सुभाष देसाई अपुऱ्या माहितीच्या आधारावर बोलत असल्याचा ठपका भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी ठेवला आहे. खासगी जमिनीच्या मालकाने या जमिनीची विक्री केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, खडसे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली आहे. खडसेंवर नवा आरोप तापी खोऱ्यात सिंचनाची कामे मिळालेल्या शिवाजी जाधव या ठेकेदाराशी खडसे यांचे संबंध असून सिंचन कंत्राटांच्या पैशांतूनच जाधव यांनी संत मुक्ताई हा साखर कारखाना विकत घेतल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे जाधव यांच्या मालकीची सुमारे ३०० एकर जमीन असून, तेव्हा अस्तित्वात असलेल्या कमाल जमीन धारणा कायद्याचा हा भंग आहे पुण्यात खडसे यांच्या कुटुंबीयांच्या नावे २०१२ मध्ये ८८ एकर जमीन खरेदी करण्यात आली. सारे नियम धाब्यावर बसवून शासकीय यंत्रणांनी खडसे यांना मदत केल्याचे दमानियांचे म्हणणे आहे पावणेचार कोटी रुपयांची जमीन विकून मोठय़ा प्रमाणावर फायदा उकळण्याचा खडसे यांचा प्रयत्न होता, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे