मुंबईतील प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात महायुतीच्या जाहीर सभेमध्ये केलेल्या भाषणामुळे शिवसेना नेते रामदास कदम अडचणीत आले आहेत. या भाषणामधून कदम यांनी मुस्लिम समाजाला लक्ष्य केल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, निवडणूक आयोगाने त्यांच्या भाषणाची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम १२३ आणि १२५ त्याचबरोबर भारतीय दंडविधान संहितेतील कलम १५३ नुसार कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील उपमुख्य निवडणूक अधिकारी ए. एन. वळवी यांना कदम यांनी वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर झालेल्या जाहीर सभेत केलेल्या भाषणाची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भारतीय जनत पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व्यासपीठावर उपस्थित असतानाच कदम यांनी आपल्या भाषणामध्ये मुंबईतील आझाद मैदानावर मुस्लिम समाजातील काहीजणांनी घातलेला गोंधळ, १९९३ नंतरची मुंबईतील दंगल, अफझलखानाची कबर बेकायदा आहे, असे मुद्दे उपस्थित केले होते. त्यांच्या याच भाषणाची सीडी मागवून त्याची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कदम यांनी केलेले भाषण आक्षेपार्ह आणि मुस्लिमविरोधी असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.