मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या अभियांत्रिकीच्या उत्तरपत्रिकांचे रॅकेट उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी शनिवारी या रॅकेटचा पर्दाफाश केला असून याप्रकरणी विद्यापीठातील आठ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये ४ कारकून, ३ शिपाई आणि एका पेपर कस्टोडिअनचा समावेश आहे. ही टोळी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन हे रॅकेट चालवत होती. अभियांत्रिकीच्या परीक्षेच्यावेळी या विद्यार्थ्यांकडून पैसे आणि हॉलतिकीट घेतले जात असे. प्रत्यक्ष परीक्षेच्यावेळी हे विद्यार्थी फक्त हजेरी लावून उत्तरपत्रिका कोरी सोडून येत असत. पेपर संपल्यानंतर रात्री या विद्यार्थ्यांना विद्यापीठात बोलावले जात असे आणि त्यांना त्यांच्या उत्तरपत्रिका दिल्या जात असत. विद्यार्थी या उत्तरपत्रिकांवर घरी जाऊन उत्तरे लिहत आणि दुसऱ्या दिवशी याच उत्तरपत्रिका परत विद्यापीठात आणून देत. यानंतर उत्तरपत्रिका परीक्षकांकडे तपासणीसाठी पाठविल्या जात असत. दरम्यान, पोलीस आता याप्रकरणाची चौकशी करत असून विद्यार्थ्यांना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आणणाऱ्या दलालांचा शोध घेत आहेत.