वांद्रे-कुर्ला परिसरात एका गाडीमध्ये कोंडून ठेवलेल्या कुटुंबातील महिलेचा मृत्यू झाला आहे. काल (रविवार) रात्री सलमान शेख, त्यांची पत्नी आयेशा शेख आणि दोन मुलांना डांबून ठेवलं असल्याचं स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आलं होतं.  त्यानंतर सदर घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर या कुटुंबाची सुटका करण्यात आली. मात्र, आयेशा यांचा मृत्यू झाला आहे. तर सलमान शेख यांना वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा मृत महिलेचे हात आणि पाय बांधलेले होते. महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीप्रमाणे ते वांद्रे-वरळी सागरीसेतूच्या दिशेने प्रवास करत होते. मात्र, मागून एक गाडी आली आणि त्यांना थांबण्यास भाग पाडले. त्यातून तीन पुरूष उतरले आणि त्यांनी पतीला मारहाण केली व नंतर त्याचे हात-पाय बांधले. यामध्ये गुन्हेगारांनी काहीच चोरी केले नसल्याचे प्रथमदर्शी समजते. दरम्य़ान, पतीसह आणखी तीन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक अंदाजानूसार पत्नीच्या हत्येसाठी पोलिसांचा संशय पतीवर असून अधिक तपास सुरू आहे.