भांडुपच्या पश्चिमेस असलेल्या मंगतराम पेट्रोलपंपाजवळील संरक्षक भिंत कोसळून एकजण ठार झाला. शुक्रवारी रात्री सुरू झालेल्या यंदाच्या पावसाळी मोसमातील हा पहिला बळी आहे.
शुक्रवारी रात्री मुंबईत पाऊस सुरू झाला. या पावसात भांडुपच्या कमला पार्क इमारतीशेजारील शितलादेवी चाळीत पाणी साठले होते. या चाळीजवळ दगड आणि विटांचे बांधकाम करून १० फुटांची संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. चाळीत शिरलेले पाणी घरांमध्ये शिरू नये यासाठी चाळीतील काही रहिवासी पाणी गटारात ढकलण्याचा प्रयत्न करीत होते. रात्री साडेअकराच्या सुमारास पुन्हा पाऊस सुरू झाला आणि पावसाच्या माऱ्याने भिंत कोसळली. त्यावेळी भिंतीजवळ उभे असलेले चौघे त्याच्या खाली सापडले. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यातील तिघांना बाहेर काढले. भांडुपच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेल्या रवींद्र घाणेकर (३५) याचा मृत्यू झाला असून सुनील जाधव या जखमीस देवकी हॉस्पिटलमध्ये तर माणिक जाधव याच्यावर अग्रवाल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. राहुल गायकवाड हा अद्याप सापडला नसल्याचे रहिवाशांनी सांगितले.