महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० किलोमीटर किनारपट्टीवरचा मच्छीमारी करणारा कोळी समाज हा या अफाट दर्याचा राजा. सूर्य उगवण्यापूर्वी सागराला जागे करणारा हा कोळी माशांच्या शोधात समुद्रात फिरत असतो. मुंबईमध्ये आधुनिक पद्धतीने व्यवसाय चालविले जात असताना मच्छीमार मात्र आजही त्याच पारंपरिक पद्धतीने आपला व्यवसाय चालवित आहेत. कित्येकदा त्यांना मत्सदुष्काळाच्या झळाही सोसाव्या लागत असल्या तरी आपल्या व्यवसायावर आणि सागरावर नितांत निष्ठा असल्यामुळे जातीने कोळी असल्याचा अभिमान त्यांना नेहमी सुखावतो. मत्सदुष्काळामध्ये त्यांना सुक्या माशांचा आधार असतो. कोळी वसत्यांवर सध्या मासे सुकविण्याची कामे सुरू आहेत. एकीकडे सागरी प्रदूषण आणि अतिक्रमणाने ग्रासलेल्या या समाजाला आता शासनाच्या उदासीनतेचाही सामना करावा लागत आहे. यामुळे पारंपरिक मच्छीमार सेवा समितीतर्फे सोमवारपासून आझाद मैदानात लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ठाणे, मुंबई आणि उत्तर रायगड जिल्हा सीमेपासून ५० सागरी मैलांच्या पुढे पर्ससीन नेट वापरण्याची परवानगी द्यावी, अशा अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. ऐरवी आकाशाच्या चांदण्याप्रमाणे समुद्रभर चमकणाऱ्या बोटी संध्याकाळी मात्र उसंत घेत उभ्या आहेत. सध्या या वस्त्यांमध्ये असेच काहीसे चित्र आहे. निर्मल हरिंद्रन