शिवसेना-भाजपमध्ये चुरस येत्या ११ ऑक्टोबर रोजी घाटकोपर येथील महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ११६ मध्ये होऊ घातलेली पोटनिवडणूक शिवसेना आणि भाजपने प्रतिष्ठेची बनवली आहे. पालिकेतील संख्याबळ एकने वाढविण्यासाठी उभयतांत चुरस लागली आहे. काँग्रेसने पालिका निवडणुकीत जिंकलेला प्रभाग क्रमांक ११६ राखण्यासाठी धडपड सुरू केली आहे. या पोटनिवडणुकीत विजय मिळावा यासाठी भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रभागात तळ ठोकला आहे, तर शिवसेनेचे आमदार अशोक पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यात जोरदार चुरस होण्याची चिन्हे आहेत गेल्या फेब्रुवारीमध्ये झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत अशोक पाटील यांच्या पत्नी मीनाक्षी पाटील यांचा सुमारे ५०० मतांनी पराभव करून काँग्रेसच्या प्रमिला पाटील विजयी झाल्या होत्या. कामगार नेते दीना बामा पाटील यांची सून प्रमिला पाटील अंतर्गत मतभेदांमुळे काँग्रेसमध्ये सामील झाल्या. पालिका निवडणुकीत विजयी झाल्यानंतर काही महिन्यांतच त्यांचे निधन झाले. त्यामुळे प्रभाग क्रमांक ११६ मध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली. काही महिन्यांपूर्वी प्रमिला पाटील यांची सून जागृती प्रतीक पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने जागृती यांना उमेदवारी देऊन पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे, तर शिवसेनेने पुन्हा एकदा मीनाक्षी यांना, तर काँग्रेसने डॉ. प्रमिला सिंह यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी आणि मनसेने पोटनिवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. भांडुप हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. फेब्रुवारीत झालेल्या पालिका निवडणुकीत भांडुप विधानसभेत शिवसेनेचे ४, काँग्रेसचे २ आणि भाजपचा १ नगरसेवक निवडून आला. तेव्हा या बालेकिल्ल्यात शिवसेनेला धक्का देण्यासाठी खासदार किरीट सोमय्या, मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार, राज्यमंत्री रवी चव्हाण, गटनेते मनोज कोटक या प्रभागात तळ ठोकून आहेत. भांडुपमधील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना प्रत्येक मतदान केंद्राची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष, महामंत्री आदी पदाधिकारीही प्रभागात दिसत होते. त्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंह, रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले, मंत्री विद्या ठाकूर, आमदार तमील सेलवन, भोजपुरी अभिनेते आणि भाजप खासदार मनोज तिवारी आदींना भाजपने प्रचारासाठी प्रभागात आणले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा नवा पक्ष या लढतीत भाजपसोबत आहे. माजी आमदार आणि कट्टर राणे समर्थक शाम सावंत भाजपच्या प्रचारसभांमध्ये व्यासपीठावर दिसत होते. मात्र शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी, वाढता विरोध आदी विविध कारणांमुळे मीनाक्षी पाटील यांच्या प्रचारात शिवसेना आमदार अशोक पाटील एकाकी पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे लढत टिकविण्यासाठी काँग्रेस उमेदवाराला शिवसेनेकडून रसद पुरविल्याची जोरदार चर्चा प्रभागात होती. आश्वासनांचा पाऊस प्रभागात साधारण ४० हजार मतदार आहेत. त्यापैकी निम्मे मराठी, १२ हजार उत्तर भारतीय आणि ४ हजार दक्षिण भारतीय मतदार आहेत. ९० टक्के मतदार बैठय़ा चाळी, झोपडपट्टय़ांमध्ये वास्तव्य करतो. पुनर्विकास, सुटसुटीत रस्ते, जोडरस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण, रोजगाराच्या संधी अशी आश्वासने सर्व पक्षांनी प्रचारात दिली आहेत.