राज्यात ‘सप्टेंबर हीट’च्या झळांचे चटके बसण्यास सुरुवात होत असतानाच पारेषण वाहिन्यांमधील बिघाडाचे निमित्त होऊन राज्यात शनिवारी तीन ते चार तासांचे भारनियमन सुरू झाले आहे.
‘पॉवर ग्रिड ऑफ इंडिया’च्या राज्यातील पारेषण यंत्रणेत शनिवारी बिघाड झाला. त्यामुळे औरंगाबाद-वर्धा, औरंगाबाद-तळेगाव या उच्चदाब वाहिन्यांमधून होणारे विजेचे वहन बंद पडले. परिणामी विजेची उपलब्धता असून सुमारे ७०० मेगावॉट वीज राज्याच्या कानाकोपऱ्यातील वीजग्राहकांपर्यंत पोहोचू शकली नाही. विजेची तूट निर्माण झाल्याने राज्याच्या शहरी-ग्रामीण अशा सर्व भागांत तीन ते चार तासांचे भारनियमन सुरू करण्यात आले. पारेषण यंत्रणेतील बिघाडाची दुरुस्ती करण्यात येत असून शनिवारी रात्रीपर्यंत यंत्रणा पूर्ववत होईल, असे ‘पॉवर ग्रिड’ने कळवले आहे. यंत्रणा पूर्ण दुरुस्त होईपर्यंत भारनियमनाचे संकट कायम राहणार आहे.