रिलायन्स जिओ फोर जीवरील मोफत सेवेमुळे दूरसंचार उद्योगच संपेल अशी भीती व्यक्त करतानाच याप्रकरणात सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. रिलायन्स जिओ ४ जीची सेवा ५ सप्टेंबरपासून सुरु होणार असून रिलायन्स जिओने मोफत व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस सेवा देण्याचे जाहीर केले. याशिवाय कंपनीचे डेटा प्लॅन्सही अत्यल्प दरात मिळणार आहे. यामुळे भारतातल्या मोबाईल ऑपरेटर कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. रिलायन्स जिओची देशभरात चर्चा रंगली असतानाच शिवसेना खासदार आणि महानगर टेलिकॉम निगम कामगार संघाचे अध्यक्ष अरविंद सावंत यांनी मात्र रिलायन्स जिओवर प्रश्न उपस्थित केले आहेत. रिलायन्स जिओने मोफत कॉलिंगची सुविधा दिली आहे. यावर भारतीय दुरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्राय काय भूमिका घेणार आहे असा सवाल त्यांनी ट्विटरवरुन उपस्थित केला आहे. जयंत सिन्हा यांना टॅग करुन त्यांनी हे ट्विट केले आहे. रिलायन्स जिओ मोफत कॉलिंगची सुविधा देणार असेल तर सरकारी नियंत्रण असलेल्या बीएसएनएल आणि एमटीएनएलनेही अशी मोफत सेवा द्यायला हवी अशी मागणीही त्यांनी केली. बीएसएनएल आणि एमटीएनएलमध्ये काम करणारे कर्मचारीदेखील सर्वसामान्यच आहेत. त्यांच्या भविष्यासाठी सरकारने हा निर्णय घेण्याची वेळ आहे असे त्यांनी म्हटले आहे. रिलायन्स जिओच्या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र छापून आले आहे. यापार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदाराने रिलायन्स जिओवर प्रश्न उपस्थित केलेत. आता भाजपकडून अरविंद सावंत यांना काय उत्तर दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.