मुंबईहून भुवनेश्वरला जात असलेल्या एअर इंडियाच्या विमानातील कॉकपिटमध्ये (चालक कक्ष) धूर येत असल्यामुळे इमर्जन्सी घोषित करण्यात आली. दुपारी सव्वा दोन वाजता मुंबईहून भुवनेश्वरला जाणाऱ्या AI६६९ या विमानाच्या कॉकपीटमधून धूर येत असल्याने पायलटने त्वरीत ते विमान सुरक्षितरित्या मुंबई विमानतळावर उतरवले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी इमर्जन्सीची घोषणा केली. विमानात किती प्रवासी होते आणि कॉकपीटमध्ये धूर कोणत्या कारणामुळे झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही. सर्व प्रवासी सुरक्षित असून त्यांना विमानातून बाहेर काढण्यात आले आहे. सर्व प्रवाशांना दुसऱ्या विमानाने भुवनेश्वरला पाठवण्यात येणार असल्याचे समजते. एअर इंडियाकडून त्वरीत तपासास सुरूवात झाली आहे. धूर कशामुळे आला याचा शाेध घेतला जात आहे.