र्निबध झुगारण्यास उद्युक्त करणाऱ्यांवर कारवाई? सर्वोच्च न्यायालयाचे आदेश झुगारुन २० फुटांहून अधिक उंचीचे चारपेक्षा अधिक थरांचे मानवी मनोरे उभारुन ‘सलामी’ देणाऱ्या गोविंदांवर न्यायालयाच्या अवमानाची कारवाई होऊ शकते का, याबाबत कायदेतज्ज्ञांमध्ये मतभिन्नता आहे. या ‘सलामी’ वीरांना अवमानाच्या कारवाईतून संशयाचा फायदा दिला जाऊ शकतो, असे काहींचे मत आहे. मात्र ज्या राजकीय नेत्यांनी न्यायालयाचे आदेश झुगारण्यासाठी उद्युक्त केले, त्यांच्यावर अवमानाची कारवाई होऊ शकते. ते पोलिसांवर अवलंबून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीची उंची २० फुटांपर्यंत असावी आणि चारपेक्षा अधिक थर लावले जाऊ नयेत, त्याचबरोबर १८ वयापेक्षा कमी वयाच्या गोविंदांचा थरांमध्ये सहभाग असू नये, असे निर्देश दिले होते. त्याचे चांगले परिणामही दिसून आले असून जखमी बालगोविंदांची संख्या फारशी नाही. पण न्यायालयाच्या र्निबधांवर शिवसेना व मनसे नेत्यांनी टीकास्त्र सोडले आणि ते झुगारुन देण्यास अनेक ठिकाणी उद्युक्त केले. पोलिसांनी काही ठिकाणी गोविंदांवर व आयोजकांवर गुन्हे दाखल केले असले तरी उद्युक्त करणाऱ्या राजकीय नेत्यांवरही न्यायालयाच्या अवमानासाठी कारवाई होऊ शकते, असे काही कायदेतज्ज्ञांनी नाव न छापण्याच्या अटीवर स्पष्ट केले. काही ठिकाणी दहीहंडी २० फुटांवर बांधण्यात आली होती. त्या ठिकाणी मंडळांनी थोडय़ा अंतरावर दहीहंडीला सलामी देताना सात ते नऊ थरांचे मानवी मनोरे उभे करुन ‘सलामी’ दिली. नंतर हंडी मात्र चार थर रचून फोडली. त्यांच्यावर न्यायालयाच्या अवमानासाठी कारवाई होऊ शकते का, याविषयी मतभिन्नता आहे. ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांच्यामते काही अंतरावर अनेक थर उभारुन सलामी देणाऱ्यांना संशयाचा फायदा मिळू शकतो. न्यायालयाचा अवमान हा तांत्रिक कायदा आहे आणि एखाद्याने जाणीवपूर्वक तो केला आहे, हे सिध्द व्हावे लागते. आणखी एका ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांनीही त्याला दुजोरा दिला व न्यायालयाच्या भूमिकेवरही ते अवलंबून असते, असे सांगितले. अॅड. उदय वारुंजीकर यांनी मात्र अनेक थरांची सलामी हा सुध्दा न्यायालयाचा अवमान असल्याचे मत व्यक्त केले. दहीहंडी या खेळाला परवानगी दिली जाते आणि संपूर्ण खेळाकडे व न्यायालयाच्या आदेशाकडे त्यादृष्टीने पाहिले पाहिजे. सलामी ही पहिली पायरी आहे. त्यामुळे अनेक थरांच्या सलामीकडे दुर्लक्ष करता येणार नाही व तांत्रिक पळवाट काढता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. १२६ जखमी यंदाच्या दहीहंडी उत्सवात उंच थरावरून पडणाऱ्या आणि गंभीर जखमी होणाऱ्या गोविंदांत घट झाली आहे. मुंबईतील रुग्णालयात सायंकाळी नऊ वाजेपर्यंत १२६ जखमी गोविंदांची नोंद करण्यात आली असून यातील ९४ गोविंदांवर उपचार करून सोडण्यात आले असून ३४ गोविंदांना वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत. ठाण्यात १६ मंडळांवर गुन्हे ठाणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश पायदळी तुडवत दहीहंडी उत्सव साजरा केल्याप्रकरणी ठाण्यातील मनसेच्या स्थानिक नेत्यांसह १६ गोविंदा मंडळांवर नौपाडा पोलिस ठाण्यात गुरूवारी सायंकाळी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये नऊ थर लावणाऱ्या जय जवान मंडळाचा समावेश आहे. बोरिवलीच्या शिवसाई मंडळानेही सायंकाळी नऊ थर लावले असून मनसे वगळता ठाण्यातील अन्य आयोजक मात्र गोविंदा पथकांना चारपेक्षा जास्त थर लावू देत नव्हते. असे असले तरी या ठिकाणी डिजेचा दणदणाट सुरू होता. ध्वनीप्रदुषण करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला थेट आव्हान देत या नेत्यांनी नऊ थरांसाठी अकरा लाखांचे बक्षिस ठेवले होते. जोगेश्वरीतील जय जवान पथक नऊ थर लावणार होते. याठिकाणी सहा ते नऊपर्यंत थर लावणाऱ्या गोविंदा पथकांमध्ये १८ वर्षांखालील मुलांचा समावेश होता. शिवसाई मित्र मंडळाने दोनदा नऊ थर लावण्याचा प्रयत्न केला. त्यापाठोपाठ जय जवान पथकाने नऊ थर लावले. एकीकडे पथक थर लावत असतानाच दुसरीकडे पोलिसांनी आयोजकांना हंडीची उंची कमी करण्यास सांगितले. त्यानंतर आयोजकांनी हंडीची उंची कमी केली, मात्र तोपर्यंत जयजवान पथकाने नऊ थर लावून सलामी दिली होती. त्यानंतर या पथकाने पुन्हा तीन थर लावून ही हंडी फोडली. नऊ थर लावल्यामुळे या पथकाला अकरा लाखांचे बक्षिस देण्यात आले. असे असले तरी आयोजक आणि जय जवान पथकासह अनेक मंडळांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी स्वत: तक्रार दाखल करत याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. रहेजा येथील संकल्प प्रतिष्ठानने यंदा रस्त्याऐवजी मैदानात २० फुटांची दहीहंडी बांधली होती. परंतु तिथे डिजेचा दणदणाट सुरू होता. टेंभीनाका मित्र मंडळ आणि बाळकुम येथील साई जलाराम प्रतिष्ठानने परवानगीपेक्षा जास्त व्यासपीठ उभारून रस्ता अडविल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. गुन्ह्य़ाचे स्वरुप.. मनसेचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसेचे जिल्हा संपर्क प्रमुख अभिजीत पानसे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीच्या ठिकाणी न्यायालयाच्या आदेशाचा भंग करण्यासाठी गोविंदा पथकांच्या पदाधिकाऱ्यांना चिथावणी दिली. तसेच २० फुटांपेक्षा जास्त उंचीची हंडी फोडण्यास चिथावणी देत १८ वर्षांखालील मुलांना धोकादायक परिस्थिती ज्यामुळे सदोष मनुष्यवध व जबर दुखापत होईल, अशाप्रकारे मानवी मनोऱ्यावर चढण्यास प्रवृत्त केले. १६ गोविंदा पथकांच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजक अविनाश जाधव व अभिजीत पानसे यांनी संगनमत करून गोविंदा पथकातील लोकांची व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात आणली, असे तक्रारीत म्हटले आहे.