कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातील बाल हृदय केंद्र विभागामध्ये पाच हजार बालकांवर हृदय उपचार क्रिया पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अवर हार्ट हिरोज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यापैकी सत्तर टक्के म्हणजेच साडेतीन हजारांहून अधिक बालके ही आर्थिकदृष्टय़ा दुर्बल कुटुंबातील होती. भारतात साधारणपणे दर शंभर बालकांमधील एकाला हृदयदोष असतो. दरवर्षी दोन ते अडीच लाख बालके असा हृदयरोग घेऊन जन्माला येतात, त्यातील साधारण साठ ते नव्वद हजार बालकांमध्ये तातडीने उपचार करण्याची गरज असते. अंबानी रुग्णालयात उपचार करण्यात आलेली नव्वद टक्क्य़ांहून अधिक बालकांनी वयाचे पहिले वर्ष पूर्ण केले आहे व त्यांना सर्वसामान्यांप्रमाणे लहानपण व आयुष्य जगता येईल, असे बालहृदय केंद्राचे संचालक डॉ. सुरेश राव म्हणाले. अवर हार्ट हिरोज या कार्यक्रमात रुग्ण, पालक, डॉक्टर व अवयवदाते यांच्या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. भारतातील दहा टक्के बालमृत्यूंचे कारण हृदयरोग आहे. कारण फक्त काही शिशुंना वेळेत योग्य उपचार मिळतात. खर्च व उपचार यांच्यामधील दरी भरून काढणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक छोटे हृदय उत्तम करण्यासाठी इथे प्रयत्न केले जातात, असे कोकिळाबेन रुग्णालयाच्या अध्यक्ष टीना अंबानी म्हणाल्या. बाल हृदय केंद्रात गेल्या सहा वर्षांत चार हजार बालकांवर हृदयशस्त्रक्रिया करण्यात आल्या. सर्वात लहान बाळ १७ तासांचे होते. शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचे प्रमाण ९६ टक्क्य़ांहून अधिक आहे.