मुंबईच्या पूर्व-पश्चिम उपनगरांत मुसळधार पाऊस सुरू असून सखल भागांत पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी भागातही पावसाचे धुमशान सुरू आहे तर, वसई-विरारमध्ये देखील पावसाचा धुमाकूळ कायम आहे. मुसळधार पावसामुळे या परिसरातील २७२ कुटुंबांना स्थलांतरीत केले आहे.
फोटो गॅलरी: नागोठाणे, महाडला पूराचा तडाखा
जोरदार पावसामुळे मुंबईकरांची ‘लाईफलाईन’ लोकलसेवा देखील रखडत सुरू आहे. मध्य आणि हार्बर  रेल्वेमार्गांवरील वाहतूक १० ते १५ मिनिटांने उशीराने सुरू आहे. त्यामुळे चाकरमान्यांना कामावर जाताना वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागले. हार्बर मार्गावरील जीटीबी नगर आणि वडाळा स्थानका दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक खोळंबली आहे.
मुंबईच्या रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली आहे. पावसाचा जोर वाढल्याने पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे, तर दींडोशी उड्डाणपुलावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.