महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्यमंडळ) घेण्यात येणाऱ्या बारावीची परीक्षा आजपासून (मंगळवार) सुरू होत असून यावर्षी राज्यातून १५ लाख ५ हजार ३६५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा १ लाख १६ हजार परीक्षार्थी वाढले आहेत, अशी माहिती राज्यमहामंडळाचे अध्यक्ष गंगाधार म्हमाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, ठिकठिकाणच्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचे औंक्षण करून स्वागत करण्यात आले.
राज्यमंडळाच्या ९ विभागीय केंद्रांच्या माध्यमातून बारावीची परीक्षा घेण्यात येते. या वर्षी २८ फेब्रुवारी ते २५ मार्च या कालावधीत ही परीक्षा होत आहे. गेली दोन वर्षे दहावीचा निकाल जास्त लागतो आहे. त्याचप्रमाणे दहावीला अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जुलैमध्येच पुनर्परीक्षा घेण्यात येत असल्यामुळे त्यातील काही विद्यार्थ्यांचे वर्ष वाचते. त्यामुळे आता बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी वाढली आहे. यावर्षी १५ लाख ५ हजार ३६५ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. गेल्यावर्षी ही संख्या १३ लाख ८८ हजार ४६७ होती. दरवर्षी बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत ४० ते ५० हजारांची वाढ होत असते. यावर्षी मात्र १ लाख १६ हजार ८९८ अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. यावर्षी बारावीच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार ही परीक्षा होत आहे. यावर्षी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ८ लाख ४८ हजार ९२९ विद्यार्थी आणि ६ लाख ५६ हजार ४३६ विद्यार्थिनी आहेत. राज्यभरात २ हजार ७१० केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.
शाखानिहाय विद्यार्थीसंख्या
विज्ञान- ५ लाख ५९ हजार ४२३
कला-५ लाख ९ हजार १२४
वाणिज्य- ३ लाख ७३ हजार ८७०
एमसीव्हीसी- ६२ हजार ९४८
एकूण- १५ लाख ५ हजार ३६५
विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन
मुंबई ०२२- २७८९३७५६, पुणे ०२०- ६५२९२३१६, नागपूर ०७१२- २५५३५०७, औरंगाबाद ०२४०- २३३४२२८, नाशिक ०२५३- २५९२१४३, कोल्हापूर ०२३१- २६९६१०३, अमरावती ०७२१- २६६२६०८, लातूर ०२३८२- २२८५७०, कोकण ०२३५२- २३१२५०