राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दोन दिवसांपूर्वीच जुलै २०१५ मध्ये लागू केलेल्या महागाई भत्तावाढीची थकबाकी देऊन आता अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना (आयएएस) जानेवारी २०१६ पासून ६ टक्के महागाई भत्तावाढ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार आता आयएएस अधिकाऱ्यांना १२५ टक्के महागाई भत्ता मिळेल. केंद्र सरकारने जाहीर केलेला महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांना जसाच्या तसा लागू करण्याचे धोरण असले तरी गेल्या काही वर्षांपासून त्याची विलंबाने अंमलजावणी केली जात आहे. राज्य सरकारची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने महागाई भत्त्यातील वाढ लगेच देणे सरकारला शक्य होत नाही. केंद्र सरकारने जुलै २०१५ मध्ये जाहीर केलेली ६ टक्के महागाई भत्तावाढ राज्य कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी २०१६ पासून लागू करण्यात आली. तर, दोन दिवसांपूर्वी मागील सात महिन्यांची थकबाकी देण्याचा शासनाने आदेश काढला आहे.