विनोदवीर कपिल शर्मा आणि अभिनेता इरफान खान हे दोघेही अवैध बांधकामामुळे अडचणीत सापडले असताना त्यात शाहरूख  खानचीही भर पडणार आहे. याआधी मन्नत या त्याच्या बंगल्यामधील एका रॅम्पमुळेही शाहरूख वादात सापडला होता. आता  या बंगल्याचे बांधकाम करताना किनारा अधिनियमन क्षेत्र कायद्याचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी तहसीलदार आणि महापालिकेचे सहाय्यक आयुक्त यांनी चौकशी करावी, असे आदेश मुंबई उपनगराच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

‘मन्नत’ बंगल्याचे बांधकाम करताना किनारा अधिनियमन क्षेत्र कायद्याचे उल्लंघन होता कामा नये, अशी अट उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातून शाहरूखसमोर ठेवण्यात आली होती. मात्र हे बांधकाम करताना या कायद्याचे उल्लंघन झाल्याची तक्रार वॉचडॉग फाऊंडेशनच्या गॉडफ्रे पिमेंटा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.  दरम्यान, याबाबत सविस्तर अहवाल आल्यानंतर पुढील माहिती देऊ, असे मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह यांनी सांगितले.