आयएनएस बेतवा दुर्घटना : खर्चाचा नेमका अंदाज आल्यानंतरच पुढील निर्णय समुद्रातील पाण्यात सोडत असताना तोल गेल्यानेच कलंडून ‘आयएनएस बेतवा’ अपघातग्रस्त झाल्याचा खुलासा संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे केला. महत्त्वाचे म्हणजे नौदल प्रमुखांनी दिलेल्या आदेशानंतर ती सुस्थितीत आणताना तब्बल दोनदा तिचा समतोल साधावा लागणार असून त्यातच नौदलाचा कस लागेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, युद्धनौकेला पोहोचलेल्या हानीच्या खर्चाबाबतच प्राथमिक अंदाज देण्यास आणखी एक दिवस लागणार असून त्यानंतर पुढील निर्णय नौदलातर्फे घेतला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. ‘आयएनएस बेतवा’च्या देखभाल-दुरुस्तीसाठी तिच्यावरील मोठी यंत्रसामग्री काढून ठेवण्यात आली होती. एरवी युद्धनौकेचा समतोल साधण्याचे महत्त्वपूर्ण कार्य तिच्या अभिकल्प आणि निर्मितीमध्येच गृहीत धरलेले असते. त्यासाठीच्या तिच्या सागरी चाचण्याही विविध वातावरणांमध्ये पार पाडल्या जातात. सर्वसाधारणपणे प्रत्येक देखभाल-दुरुस्तीनंतर प्रत्येक युद्धनौकेच्या सागरी चाचण्या घेतल्या जातात, त्यामध्ये प्रामुख्याने हा समतोल साधण्याचा भाग प्राधान्यक्रमामध्ये सर्वात वरती असतो. अलीकडेच विमानवाहू युद्धनौका असलेल्या ‘आयएनएस विक्रमादित्य’च्या देखभाल-दुरुस्तीचे काम पार पडले. तिच्या सागरी चाचण्यांना आता सुरुवात होत आहे. या पाश्र्वभूमीवर ‘आयएनएस बेतवा’च्या बाबतीत पहिला कस लागेल तो तिला उचलून सरळ करताना. त्या वेळेस आतील यांत्रिक भाग, त्यांचे वजन, त्यांचा भार कोणत्या भागात येणार आहे, याचे नेमके गणित करून त्यानंतर बलाबल वापरले जाईल. गणित जेवढे नेमके तेवढी कारवाई सोपी जाईल. युद्धनौकेची एक बाजू या दुर्घटनेमध्ये पूर्णपणे चेपली गेली आहे. युद्धनौकेच्या वजनाचा भार गृहीत धरून त्यानुसार तिच्या दोन्ही बाजूंच्या भागाचा आकार, वजन आधिक्याने विभागले जाईल अशा पद्धतीने अभिकल्पित केला जातो. या दुर्घटनेमध्ये युद्धनौकेची एक बाजू पूर्णपणे चेपली गेली आहे.