‘शिक्षक होण्यासाठी पुण्यात डी. एडला प्रवेश घेतला. वसतिगृहात राहायचो. शिक्षण घेताना काहीतरी कमाई करावी यासाठी पुण्यातील सायनॅगॉग मार्गावरील ‘जमात-ए-इस्लामी’ या पुस्तकांच्या दुकानात अर्धवेळ नोकरी करायचो. तिथे माझ्याकडे एकाने ‘जिहाद’च्या पुस्तकाविषयी चौकशी केली. पण तसे पुस्तक उपलब्ध नव्हते. मात्र, तेव्हापासून जिहादबाबतची उत्सुकता वाढू लागली. त्यातूनच लष्कर-ए-तय्यबाचा कमांडर अबू खलिदशी संपर्क झाला. इंटरनेटच्या  माध्यमातून त्याच्याशी ‘चॅटिंग’ करताना धर्मासाठी लढण्याची शपथ त्याने दिली आणि मी जिहादचे धडे गिरवू लागलो..’ इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी कातिल सिद्दिकी याची ही जबानी. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) त्याने विद्यार्थिदशा ते कट्टर दहशतवादी या आपल्या प्रवासाचा वृत्तांतच सादर केला होता. कातिलने २०११ मध्ये दिलेल्या जबानीची ही प्रत ‘लोकसत्ता’कडे उपलब्ध आहे.
कल्याणमधील चार युवकांनी इराकमधील संघर्षांत सहभागी होण्यासाठी जिहादचा आसरा घेतल्याच्या पाश्र्वभूमीवर नेमक्या तरुणांना हेरून त्यांच्यात जिहादी मानसिकता कशी पद्धतशीरपणे रुजवली जाते हेच यातून अधोरेखित होते. मूळचा बीडचा रहिवासी असलेला कातिल २००४ मध्ये डी. एडसाठी पुण्यात आला. पुस्तकांच्या दुकानात त्याची अकबर इस्माइल चौधरीशी ओळख झाली. अकबरनेच कातिलला जिहाद म्हणजे काय वगैरेची माहिती दिली. त्यातूनच त्याने कातिलला भटकळ येथे पाठवले. तिथे कातिलची इक्बाल व रियाझ भटकळ यांच्याशी ओळख झाली. रियाझने कातिलला जिहाद पटवून दिला. २००६ मध्ये डी.एड पूर्ण करून तो बीडला परतला. त्याचवेळी औरंगाबाद येथे गुप्तचर यंत्रणेने दोघा दहशतवाद्यांना शस्रसाठय़ासह पकडले होते. समदने कातिलला बीडमधून पळून जाण्यास सांगितले. तिथून कातिल पुणेमार्गे भटकळला पळाला. पुन्हा पुण्यात आल्यावर कातिलने नाव बदलून जिहादचे काम सुरूच ठेवले होते.