डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय गोरखपूरमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतरचा ‘योगिक बालकांड’ हा अग्रलेख (लोकसत्ता, १४ ऑगस्ट) नक्कीच अंतर्मुख करायला लावणारा आहे. गोरखपूरप्रमाणे एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतरच्या राजकारणांच्या बदलणाऱ्या भूमिकेबाबत या अग्रलेखात प्रश्न विचारण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील बालमृत्यूनंतर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागण्यात आला होता. आता उत्तर प्रदेशमध्ये तोच पक्ष शांत का आहे, असा प्रश्न संपादकांनी उपस्थित केला आहे. सर्वसामान्य लोक काही काळानंतर असे प्रसंग व भूमिका विसरून जातात. संपादकांनी सजगतेने राजकारणी भूमिकेतील विसंगती आपल्या नजरेस आणून दिली आहे. राजकारण्यांनी घेतलेली भूमिका कदाचित त्यांच्या दृष्टीने किंवा त्यांच्या हेतूंनुसार योग्यच असेल; पण आरोग्य क्षेत्रात घडणाऱ्या अशा घटनांकडे पाहताना त्याची कारणमीमांसा लक्षात घेणे आवश्यक असते. आरोग्य क्षेत्र अतिशय गुंतागुंतीचे असल्याने एका मुद्दय़ाला अनेक कंगोरे असू शकतात; परंतु कुठलीही शहानिशा न करता आरोप केले जातात. आरोग्य क्षेत्रात एकाच विषयाचे अनेक पैलू लक्षात घेता याची अनेक कारणे असू शकतात. गोरखपूरमधील रुग्णालयात प्राणवायूचा पुरवठा न झाल्याची माध्यमांकडून आलेली माहिती सर्वांपर्यंत पोहोचली आहे. ती चौकशी होण्यापूर्वी आली असल्याने त्यात त्रुटी राहण्याची शक्यता आहे. मात्र यापूर्वी बालमृत्यूंमध्ये नेमका दोष काय होता तोही पाहणे आवश्यक आहे. केवळ प्राणवायूचा अभाव नाही, तर मेंदूज्वर, मानवी चुका, रुग्णालयातील अति गर्दी व अपुऱ्या सुविधा याही गोष्टी कारणीभूत असू शकतात. अशा वेळी सर्वसामान्यांकडून वैद्यकीय निदान तसेच व्यवस्थेच्या अडचणी समजून घेतल्या जात नाहीत. वस्तुत: या घटनांकडे चारही बाजूंनी पाहता यायला हवे; परंतु अखेर सर्व दोष हे डॉक्टर व अधिकाऱ्यांवरच येतात. अनेकदा अशा घटनांमध्ये आरोग्यकारणापेक्षा राजकारण जास्त असते. काही वेळा तर रुग्ण दगावल्यानंतर त्याचे बिल द्यावे लागू नये म्हणूनही आरोप केले जातात. आरोग्य क्षेत्रातील अशा घटनांमध्ये राजकीय फायद्यासाठीचे आरोप, राजीनामा नाटय़ अशा गोष्टी येणे हे सुजाण समाजाचे लक्षण नव्हे. या प्रकरणात चौकशीअंती जो दोषी असेल त्याला शिक्षा होणे आवश्यकच आहे, मात्र आधी सांगोपांग चौकशी लवकर करावी इतकेच. केवळ राजकारणासाठी कोणत्याही डॉक्टरचा किंवा अधिकाऱ्याचा बळी दिला जाऊ नये एवढेच.