एका बाजूला पारसिक डोंगरांच्या रांगा तर दुसऱ्या बाजूला ठाणे खाडीचे विस्तीर्ण पात्र आणि मधोमध बेकायदा पायावर उभे राहिलेल्या इमले, अशी स्थिती असलेल्या मुंब््रयातील अपघाताचे भय वर्षभर कायम असते.
या परिसरातील अनेक बेकायदा वस्त्या पारसिक डोंगरांच्या टेकडय़ांची हद्द ओलांडून कधीच डोंगराच्या पायाशी पोहचल्या आहेत. हाच डोंगर कापून उभा केलेला मुंब्रा बायपास अधूनमधून खचतो तेव्हा खाली लाखोंच्या लोकसंख्येसह वसलेल्या मुंब््रयातील भयाची सहज कल्पना येते. बेकायदा रेती उत्खननामुळे खाडीची खोली वाढते आहे आणि त्यामुळे  मुंब््रयाच्या भूगर्भात धोकादायक पद्धतीच्या हालचाली सुरू असल्याचा निष्कर्ष मध्यंतरी महापालिकेने जाहीर केलेल्या एका अहवालात काढण्यात आला होता. यावर उपाय म्हणून मुंब््रयातील बेकायदा वस्त्यांना क्लस्टरचे कवच देऊन पुनर्बाधणी करण्याचा निर्णय पक्का झाला असला तरी पावसाचा जोर वाढतो तसेच मुंब््रयावासीयांच्या पोटात खड्डा पडल्याशिवाय राहात नाही.
दरम्यान, सलग दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे ठाणे तसेच मुंब्रा परिसरातील इमारतीचे स्लॅबचे प्लास्टर आणि संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना बुधवारी घडल्या असून सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे वृत्त आहे.