देशातील अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (आयआयटी) कामात राजकीय हस्तक्षेप योग्य नाही, असे सूचक उद्गार ज्येष्ठ संशोधक डॉ. अनिल काकोडकर यांनी मुंबईत काढले.
इनोव्हेशन फेस्टिव्हलचे उद्घाटन काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले.
आयआयटीची स्थापना ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणून करण्यात आली आहे. त्यांचा दर्जा टिकून राहण्याकरिता या संस्थांना स्वतंत्रपणे काम करू देणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्या कामात राजकीय हस्तक्षेप योग्य नसल्याचे काकोडकर यांनी स्पष्ट केले. भुवनेश्वर आणि रोपार येथील आयआयटीच्या संचालकांच्या निवडीवरून सुरू असलेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर डॉ. काकोडकर यांनी केलेले हे वक्तव्य सूचक मानले जात आहे. या वादामुळे डॉ. काकोडकर यांनी मुंबईच्या आयआयटीच्या गव्हर्नन्स मंडळाच्या अध्यक्षपदावरून व संचालकांच्या निवड समितीचा तडकाफडकी राजीनामा दिल होता.