वडाळा रोड येथे कुल्र्याला जाणाऱ्या मार्गावर रेल्वे रूळाला तडा गेल्याने गुरुवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी हार्बर रेल्वे विस्कळीत झाली. यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल दरम्यानच्या ४५ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. सकाळी ८.४८ ते ९.३७ वाजेपर्यंत वाशी-पनवेल कडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने चालविण्यात येत होती. मात्र त्यानंतर वाहतूक बंद करण्यात आली. रूळ बदलण्यासाठी १०.५८ ते ११.१५ पर्यंत ब्लॉक करण्यात आला. रूळ बदलण्यात आल्यावर ११.३० वाजता वाहतूक पूर्ववत सुरू झाल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक ४० ते ४५ मिनिटे विलंबाने सुरू होती. या काळात कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मुख्य मार्गावरुन प्रवास करण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.