रेल्वेस महसुलाची टंचाई असल्याने रेल्वेने सरसकट वाढ करणे अपेक्षित होते. मात्र जनक्षोभाच्या भीतीने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ही दरवाढ केली नसावी. सरसकट तिकीट दरवाढ टाळण्याच्या अंगचोरीमुळे रेल्वेसमोरील प्रश्नाचे गांभीर्य संपण्यास संपूर्ण मदत होणार नाही. रेल्वे महसूलप्रणालीबाबत, असे मत मांडणाऱ्या ‘झुलणे आणि झुलवणे’ या अग्रलेखावर व्यक्त होणारा मुंबईच्या ‘रुईया महाविद्यालया’चा विद्यार्थी मोहन गायकवाड ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत पहिल्या पारितोषिकाचा विजेता ठरला. तर या स्पर्धेत ‘किसानवीर महाविद्यालय, वाई’ची विद्यार्थिनी समृद्धी देशमुख हिने दुसरे पारितोषिक पटकावले. ‘झुलणे आणि झुलवणे’ अग्रलेखावर मत मांडणाऱ्या मोहन व समृद्धी यांनी चांगले लेखन करीत ‘ब्लॉग बेंचर्स’स्पर्धेत बाजी मारली. मोहनला सात हजार आणि प्रमाणपत्र तर समृद्धीला पाच हजार आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार असून या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते गौरविण्यात येईल. या अग्रलेखावर मत मांडताना नेहमीप्रमाणेच बहुतांश विद्यार्थ्यांनी चांगले लेखन करीत आपल्यातील विचारी वृत्तीला चालना दिल्याचे दिसून आले. यात विनायक अरोटे, विवेक ढगे, अभिजित पवार, भागवत सांगळे आदींनी स्पर्धेत विशेष उल्लेखनीय लेखन केले. या स्पर्धेमध्ये वैचारिक वृत्तीला चालना देणाऱ्यांची संख्या वाढती असून राज्यभरातून अधिकाधिक विद्यार्थी आपला सहभाग नोंदवत आहेत. त्यामुळे, योग्य विजेता निवडण्यासाठी परीक्षकांना विशेष मेहनत घ्यावी लागत आहे. महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला आहे. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते.