अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर

नाटय़ कलेच्या अंगीभूत गुणांना विकसित करण्यासाठी नवे रंगपीठ म्हणून ‘लोकसत्ता लोकांकिका’ वर्षभरातच नावारूपाला आले आहे. नाटय़वेडय़ा महाविद्यालयीन तरुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेचे पडघम वाजू लागले आहेत.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत लोकसत्ता लोकांकिका या स्पर्धेसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख जाहीर झाली असून राज्यभरात १५ सप्टेंबपर्यंत या स्पर्धेचे अर्ज स्वीकारले जातील. त्यानंतर २९ सप्टेंबर रोजी औरंगाबाद केंद्रापासून या स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरू होणार आहे. सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफीस यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेसाठी गेल्या वर्षी तब्बल २००हून अधिक महाविद्यालयांनी आपला अर्ज सादर केला होता. अस्तित्व या संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेतील कलाकारांचे कलागुण जोखून त्यांना विविध मालिका-चित्रपट-नाटके यांचे कोंदण देण्यासाठी आयरिस प्रॉडक्शन्स हे टॅलेण्ट पार्टनर म्हणून काम पाहणार आहेत. त्याशिवाय यंदा प्राथमिक फेरीसाठी रेड एफएम ९३.५ रेडिओ पार्टनर म्हणून सहभागी झाले आहेत. तसेच झी मराठी नक्षत्र हे टेलिव्हिजन पार्टनर म्हणून आणि स्टडी सर्कल नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहणार आहेत. गेल्यावर्षी लोकांकिकाचे व्यासपीठ गाजवणाऱ्या कलाकारांना नवी संधी निर्माण झाली आहे.
‘लोकसत्ता लोकांकिका’चे अर्ज indianexpress-loksatta.go-vip.net/lokankika2015 या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. हे अर्ज पूर्ण भरून सोबत महाविद्यालयाचे परवानगीपत्र जोडून ते १५ सप्टेंबपर्यंत ‘लोकसत्ता’च्या विभागीय कार्यालयांमध्ये पोहोचते करायचे आहेत.

१५ सप्टेंबरनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. तसेच अर्ज अपूर्ण असल्यास त्या अर्जाचाही विचार होणार नाही. पात्र ठरलेल्या अर्जदार महाविद्यालयांच्या एकांकिका २९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर रोजी रंगणाऱ्या प्राथमिक फेरीत सादर होतील.

ही प्राथमिक फेरी औरंगाबाद, रत्नागिरी, नाशिक, नागपूर, अहमदनगर, ठाणे, मुंबई आणि पुणे या आठ केंद्रांवर होईल. त्यानंतर या केंद्रांवरील प्राथमिक फेरीतून निवडलेल्या एकांकिकांची विभागीय अंतिम फेरी ६ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर दरम्यान होईल.

१७ ऑक्टोबरला मुंबईतील महाअंतिम फेरीत अंतिम फेरीत सवरेत्कृष्ट ठरलेल्या आठ एकांकिकांमधून लोकांकिका निवडली जाईल.
वैशिष्टय़े
* २९ सप्टेंबरपासून प्राथमिक फेरीला सुरुवात होणार
* राज्यातील आठ केंद्रांवर होणारी एकमेव स्पर्धा
* गतवर्षी २०० हून अधिक महाविद्यालयांचा सहभाग
* स्पर्धेतील गुणवंतांना छोटय़ा-मोठय़ा पडद्यावर चमकण्याची संधी
* चित्रपट-नाटय़ क्षेत्रातील मातब्बरांची परीक्षक म्हणून उपस्थिती