२८ जानेवारीपासून प्राथमिक फेरीला सुरुवात; महाअंतिम फेरी १७ फेब्रुवारी रोजी ‘वक्तृत्व’ ही एक कला असून अभ्यास, सराव आणि मार्गदर्शन यातून उत्तम वक्ता घडू शकतो. महाराष्ट्राला अभ्यासू, विचारवंत वक्त्यांची परंपरा लाभली असून गेल्या काही वर्षांत ‘वक्तृत्व कला’ आणि चांगले वक्ते हळूहळू कमी होत चालले आहेत. समाजमन आणि विचार घडविणाऱ्या वक्तृत्व कलेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘वक्ता दशसहस्रेषु’ स्पर्धेचे यंदा तिसरे वर्ष आहे. ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’च्या महाअंतिम फेरीत पोहोचणाऱ्या स्पर्धकांना यंदा ज्येष्ठ सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’च्या प्राथमिक फेरीला येत्या २८ जानेवारीपासून सुरुवात होणार असून स्पर्धेची महाअंतिम फेरी १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. लोकसत्ता आयोजित आणि वीणा वर्ल्ड प्रस्तुत व ‘पॉवर्ड बाय’ बँक ऑफ महाराष्ट्र, द विश्वेश्वर को. ऑ. बँक लिमिटेड, ‘आयसीडी’ (इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट) ‘एमआयटी’ असलेल्या या स्पर्धेने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये एक स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. गेली दोन वर्षे राज्यभरातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या स्पर्धेला मिळत आहे. राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन असलेल्या या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला २८ जानेवारीपासून राज्यातील आठ विविध केंद्रांवर सुरुवात होणार आहे. २८ जानेवारी रोजी ठाणे केंद्रावरून स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात होणार असून नागपूर केंद्रावर ४ व ५ फेब्रुवारी रोजी प्राथमिक फेरीची सांगता होणार आहे. मुंबई, नाशिक, पुणे, नगर, रत्नागिरी आणि औरंगाबाद या केंद्रांवरही प्राथमिक फेरी होणार आहे. प्राथमिक फेरीनंतर विभागीय अंतिम फेरी आणि त्यानंतर महाअंतिम फेरी होणार असून त्यातून महाराष्ट्राच्या ‘वक्ता दशसहस्रेषु’ची निवड केली जाणार आहे. लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धेचे नियम आणि अटी याबाबतची माहिती खालील संकेतस्थळावर मिळेल. indianexpress-loksatta.go-vip.net/vaktrutva-spardha-2017/