मंत्रिमंडळात आपल्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधीची वर्णी लागावी, यासाठी अनेक मतदार प्रतीक्षा करत असतात. मंत्रिपद आले की मतदारसंघातील विकासाची कामे भराभर होतात, अशी समजूत असते. मात्र सगळ्याच मतदारसंघांच्या नशिबी मंत्रिपदाची लॉटरी नसते. मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील गोरेगाव मतदारसंघाला मात्र, फडणवीस सरकारमध्ये दुहेरी लॉटरी लागली आहे. या मतदारसंघातून भाजपच्या विद्या ठाकूर विजयी झाल्या. शिवसेनेचे दिग्गज नेते सुभाष देसाई यांना पराभूत करण्याचा पराक्रम केल्याची बक्षिसी म्हणून त्यांच्या गळ्यात राज्यमंत्रिपदाची माळ पडली. आता ठाकूर यांच्याकडून पराभूत झालेले शिवसेनेचे सुभाष देसाई यांनीही फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट दर्जाचे मंत्री म्हणून प्रवेश केला आहे.
पराभव करणाऱ्यास राज्यमंत्रिपद आणि पराभूतास कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने, आज शपथविधीच्या शामियान्यातही याचीच चर्चा होती. राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्याकडून पराभूत झालेले शिवसेनेचे सुभाष देसाई यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.