राज्य सरकारकडून आगामी काळात पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी मुंबईत २५ ते ३० हजार स्वस्त घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी झालेल्या कार्यक्रमात याबद्दलची माहिती दिली. राज्य सरकार मुंबई आणि मुंबईबाहेर पोलीस कर्मचाऱ्यांना स्वत:च्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी टप्प्याटप्प्याने घरे उपलब्ध करून देणार आहे. यापैकी २५ ते ३० हजार स्वस्त घरे मुंबईत बांधण्यात येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या घरांच्या खरेदीसाठी पोलीस कर्मचाऱ्यांना कर्जसुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय, घाटकोपर येथे पोलिसांसाठी स्मार्ट टाऊनशिपही उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या टाऊनशिपमध्ये शिक्षण आणि आरोग्यासह सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध असतील. तसेच पोलीस दलातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी महात्मा फुले योजनेतून मोफत उपचारांची सोय करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.