देशाची लोकसंख्या तरुण असल्याने भारत महासत्ता होऊ शकतो, हे ओळखून अहोरात्र झटणारे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना मंगळवारी विधिमंडळात भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. देशातील युवाशक्तीची ताकद ओखळून भारत महासत्ता बनू शकतो याचा विश्वास डॉ. कलाम यांनी देशवासीयांमध्ये रुजविला, मात्र ते स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर असतानाच कलाम आपल्याला सोडून गेले. त्यामुळे देशाला महासत्ता बनविणे हीच त्यांना आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि विधान परिषदेचे माजी सभापती तसेच माजी राज्यपाल रा. सू. गवई यांच्या निधानाबद्दल त्यांना आदरांजली वाहणारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडलेला शोकप्रस्ताव विधानसभा आणि विधान परिषदेत संमत करण्यात आला. डॉ. कलाम यांनी आपल्या विचार आणि कर्तृत्वाने तरुण पिढीला भारावून टाकले होते. डॉ. कलाम यांचे सारे आयुष्य विज्ञान क्षेत्रात नवनवीन शोध लावण्यात गेले, त्यामुळे त्यांचा जन्मदिन विज्ञान दिन म्हणून साजरा करावा, अशी मागणी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली.
कलाम यांच्या निधनामुळे देशाला महासत्ता करण्यासाठी सच्चा देशभक्ताला आपण मुकलो. पोखरणची अणुचाचणी हा त्यांच्या प्रतिभेचा आविष्कार होता. त्यांचे मार्गदर्शन नव्या पिठीला प्रेरणादायी होते, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी कलाम यांना आदरांजली वाहिली. तर आयुष्याच्या अखेपर्यंत राज्यकर्त्यांपासून युवापिढीपर्यंत सर्वाना योग्य दिशा देण्याचे काम कलाम यांनी केल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. तर कलाम हे पंडित नेहरू यांच्यानंतर मुलांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय होते, असे अजित पवार यांनी सांगितले. कोटय़वधी मुलांच्या स्वप्नांना पंख देण्याचे काम डॉ. कलाम यांनी केल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कलाम हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. देशवासीयांची मानसिकता सकारात्मक करण्याचे काम त्यांनी केल्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले.

गवई यांना श्रद्धांजली
माजी राज्यपाल रा. सू. गवई यांनाही दोन्ही सभागृहांत आदरांजली वाहण्यात आली. माजी राज्यपाल रा. सू. गवई यांच्या निधनाने समाजवादी चळवळीचे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गवई हे दीक्षा भूमीचे शिल्पकार होते, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी, तर रिपाइं ऐक्याची मूठ बांधण्याचे काम गवई यांनी केल्याचे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सुभाष देसाई, गणपतराव देशमुख, इम्तियाज अली यांचीही डॉ. कलाम आणि गवई यांना आदरांली वाहणारी भाषणे झाली.