पोलिसांच्या वारसांना पोलीस शिपाई भरतीत पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच २०११मध्ये भरती झालेल्या मात्र नियुक्ती न दिलेल्या ५२९ उमेदवारांनाही सेवेत सामावून घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी दिली. तसेच पोलिसांना यापुढे गणवेश साहित्याऐवजी गणवेश भत्ता देण्याचा निर्णयही घेण्यात आला असून १ लाख ८८ हजार ८३२ पोलिसांना याचा फायदा होणार आहे.पोलीस दलात सेवा बजावणारे शिपाई निवृत्त झाल्यानंतर वा त्यांचा अकाली मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला आधार नसतो. त्यामुळे पोलीस शिपायांच्या वारसांना नोकरीत आरक्षण देण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्यानुसार पोलिसांच्या मुलांना शिपाई भरतीमध्ये ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंशकालीन पदवीधरांसाठी राखीव समांतर आरक्षणापैकी तीन टक्के आरक्षण हे कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी तर सेवेत कार्यरत असताना अकाली निधन झालेल्या पोलिसांच्या मुलांना अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी दोन टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. २०११मध्ये पोलीस भरतीत निवड झालेल्या मात्र अद्याप नियुक्ती न मिळालेल्या ५२० उमेदवारांना सेवेत सामावून घेण्यात येईल. त्यामध्ये १५८ जणांना पोलीस सेवेत तर ३७१ जणांना कारागृह सेवेत सामावून घेण्यात येणार आहे.