‘मेक इन इंडिया’ सप्ताहअंतर्गत रविवारी गिरगाव चौपाटीवर आयोजित करण्यात आलेला ‘महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रम सुरू असतानाच व्यासपीठाला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मोठय़ा प्रमाणात आग लागली. जोरदार वाऱ्यांमुळे आग दहा मिनिटांत संपूर्ण व्यासपीठावर पसरली. आग लागताच व्यासपीठासमोर बसलेले राज्यपाल, मुख्यमंत्री, राजकीय नेते, मान्यवर तसेच विदेशातील राजनैतिक अधिकारी यांना तातडीने सुरक्षितस्थळी नेण्यात आले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच कोणीही जखमी झाले नाही. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा घटनास्थळ गाठून आग आटोक्यात येईपर्यंत तेथे तळ ठोकला. आगीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून मेक इन इंडियाच्या कार्यक्रमात कोणतेही बदल होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.