एस.टी. महामंडळाच्या ‘सौजन्य अभिवादन मोहिमे’चा फज्जा उडाल्याचे चित्र सध्या जवळपास सर्वच आगारांमध्ये दिसत आहे. विमानसेवेच्या धर्तीवर बसमधील वाहकानेही बस सुटण्यापूर्वी बसचालकाचे नाव तसेच ती कोणत्या मार्गाने जाणार, त्याचा थांबा कोठे कोठे असेल, तसेच प्रवासाचा अंदाजित कालावधी, अशी तब्बल १६ प्रकारची माहिती प्रवाशांना सांगावी, असा फतवा महामंडळातर्फे नववर्षांच्या प्रारंभी जारी करण्यात आला. त्यासाठी काही कर्मचाऱ्यांना आधी आठ ते दहा दिवस प्रशिक्षण देण्यातही आले होते. पण पहिल्या दिवशीचा उत्साह वगळता कुठेही वाहकांकडून याची अंमलबजावणी होत नसल्याचे वास्तव समोर आहे.
आम्ही जर या प्रवाशांना नमस्कार करीत १६ गोष्टी सांगत बसलो तर आमचे  तिकिटे देण्याचे आमचे मुख्य काम पूर्ण होणारच नाही, असा तक्रारवजा सूर अनेक वाहक व्यक्त करीत आहेत. योजना चांगली असली तरी प्रवाशांनी खच्चून भरलेल्या बसमध्ये हे कसे शक्य आहे, असा सवालही वाहक करीत आहेत.