अभिनेत्री अश्विनी एकबोटेंच्या निधनाने मराठी रंगभूमीवर शोककळा पसरली आहे. अश्विनी एकबोटेंनी रंगमंचावर सादरीकरण करत असताना जगातून एक्झिट घेतली. मात्र याआधीही अनेक मराठी कलाकारांचे अकाली निधन चाहत्यांना चटका लावून गेले आहे. आनंद अभ्यंकर २०१२ साली मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात अभिनेते आनंद अभ्यंकर यांचा मृत्यू झाला. वयाच्या ४८ व्या वर्षी आनंद अभ्यंकर यांनी जगाचा निरोप घेतला. आनंद अभ्यंकर हे मोठ्या आणि छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कलाकार होते. ‘या गोजीरवाण्या घरात’ मालिकेतील त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. वास्तव, जिस देश में गंगा रहता है, मातीच्या चुली, स्पंदन या सिनेमांमध्ये त्यांनी काम केले होते. अक्षय पेंडसे २०१२ मध्ये मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आनंद अभ्यंकर यांच्यासोबतच्या अपघातात अभिनेता अक्षय पेंडसेचा देखील मृत्यू झाला. निधनावेळी अक्षयचे वय फक्त ३३ वर्षे इतके होते. उर्से टोलनाक्याजवळ बऊर गावाजवळ अभ्यंकर यांच्या मारुती व्हॅगनार गाडीला भरधाव टेम्पोने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात अभिनेते अक्षय पेंडसे आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा प्रत्युषचाही मृत्यू झाला. एका कार्यक्रमाचे चित्रीकरण संपवून अक्षय पेंडसे आनंद अभ्यंकर यांच्यासोबत पुण्याहून मुंबईकडे निघाला होता. अक्षय पेंडसेने प्रायोगिक रंगभूमीवर अनेक नाटकांमध्ये काम केले होते. माझ्या वाटणीचे खरेखुरे, सिगारेट्स ही प्रायोगिक नाटके, ‘मिस्टर नामदेव म्हणे’ हे व्यावसायिक नाटक आणि ‘उत्तरायण’ चित्रपटातील त्याच्या भूमिका विशेष लक्षवेधी ठरल्या होत्या. भक्ती बर्वे - इनामदार हिंदी-मराठी सिनेमांत आणि मराठी-गुजराती नाटकांत काम करणा-या प्रसिद्ध अभिनेत्री भक्ती बर्वे इनामदार यांचे मोटार अपघातात वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते. १२ फेब्रुवारी २००१ रोजी ही दुर्दैवी घटना घडली होती. अरुण सरनाईक एक गाव बारा भानगडी, मुंबईचा जावई, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, सिंहासन यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची मोहोर उमटवलेले अभिनेते अरुण सरनाईक यांचे १९८४ मध्ये पुण्याहून कोल्हापूरला जाताना टॅक्सीच्या अपघातात निधन झाले होते. त्यावेळी अरुण सरनाईक ४९ वर्षांचे होते. अतुल अभ्यंकर झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘जय मल्हार’ या मालिकेतील हेगडी प्रधानांची भूमिका साकारणारे अभिनेते अतुल अभ्यंकर यांचे 12 नोव्हेंबर २०१४ रोजी पहाटे तीन वाजता ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते.